राष्ट्रीय महामार्गच गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:30+5:30
रोडवरच मोठे व खोल खड्डे पडल्याने जड वाहनांना मार्ग काढावा कोठून असा प्रश्न पडतो आहे. लहान वाहने तर या खड्ड्यात उलटतात की काय, अशी भीती निर्माण होते. चालक सावध नसेल तर या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात निश्चित आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने व खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : नागपूर-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ चक्क खड्ड्यात गेला असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. कारण पांढरकवडा तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि गुडघ्याएवढे खोल खड्डे पडल्याचे चित्र आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
केंद्रातील भाजप सरकार देशभर कनेक्टीव्हीटी निर्माण केल्याचा दावा करीत आहे. त्यासाठी नवनवीन रस्ते बांधकाम हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आवश्यकता नसताना त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरी मार्ग केले गेले आहेत. तर दुसरीकडे जुन्या महामार्गांचा दर्जा अगदीच सुमार आहे. नागपूर-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ सध्या खड्ड्यांमुळे केंद्रातील भाजप सरकारचे दुर्लक्ष, अपयश अधोरेखीत करतो आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. विशेषत: राळेगाव व पांढरकवडा या दोन तालुक्यातून जाणाºया मार्गांवर खड्ड्यांची संख्या अधिक आहे. संपूर्ण रोडवरच मोठे व खोल खड्डे पडल्याने जड वाहनांना मार्ग काढावा कोठून असा प्रश्न पडतो आहे. लहान वाहने तर या खड्ड्यात उलटतात की काय, अशी भीती निर्माण होते. चालक सावध नसेल तर या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात निश्चित आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने व खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहे. कुणाचा जीव गेला तर कुणाला कायम अपंगत्व आले आहे. खड्डे वाचविताना वाहने रस्त्याच्या कडेला उलटल्याचीही उदाहरणे आहेत.
या महामार्गावर वाहनांकडून ठिकठिकाणी टोल टॅक्स वसुली होत असताना रस्त्यांची ही खस्ता हालत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र तेलंगणामध्ये विपरित स्थिती आहे. तेथे रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती होत असल्याचे सांगण्यात आले. उखडलेल्या रस्त्यांना जबाबदार कोण, हे खड्डे बुजविण्याची जबाबदारी कुणाकडे, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे याकडे दुर्लक्ष का आदी प्रश्न उपस्थित केले जात आहे.