चार लाख शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:14+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि इतर पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांचा विमा उतरविला. यामध्ये पीक विमा उतरविताना शेतकऱ्यांनी पिकांना संरक्षित करण्यासाठी कापसाला पहिले प्राधान्य दिले. त्या खालोखाल सोयाबीन आणि नंतर इतर पीक नाममात्र प्रमाणात संरक्षित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे. ३१ जुलैपर्यंत सीएससी केंद्रांमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी तीन लाख हेक्टरवरील पीक संरक्षित केले आहे. बँकांमधील पीक कर्जधारक शेतकऱ्यांनी विमा उतरविला. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्रसिद्ध व्हायचा आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर आणि इतर पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांचा विमा उतरविला. यामध्ये पीक विमा उतरविताना शेतकऱ्यांनी पिकांना संरक्षित करण्यासाठी कापसाला पहिले प्राधान्य दिले. त्या खालोखाल सोयाबीन आणि नंतर इतर पीक नाममात्र प्रमाणात संरक्षित करण्यात आले आहे.
याकरिता कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग आहे. जिल्ह्यातील तीन लाख ८८ हजार ३७२ बिगर कर्जदार शेतकºयांनी त्याकरिता पुढाकार घेतला. दोन लाख ७० हजार ५५२ हेक्टरवरील पीक शेतकऱ्यांनी संरक्षित केले. त्याकरिता दोन कोटी ७२ लाख ३२ हजार २९७ रूपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे वर्ग केला आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनानेही याकरिता विम्याची काही रक्कम पीक विमा कंपनीकडे जमा केली आहे.
मात्र नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने भरपाई पोहोचती करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. यापूर्वीच्या विम्याचे अनुभव वाईट आल्याने यंदा शेतकरी दक्ष आहेत.
कर्जदार शेतकऱ्यांचा आकडा गुलदस्त्यात
कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. मात्र किती शेतकऱ्यांनी विमा उतरविला याचा अहवाल अद्याप बँकांनी प्रसिद्ध केला नाही. येत्या काही दिवसात हा अहवाल प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.