शेतकरी उद्घाटकाचा वर्षभरातच पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:06+5:30
यवतमाळच्या संमेलनाला सुरुवातीला नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांचे निमंत्रण नंतर वादात अडकले. ऐनवेळी वैशाली येडे (राजूर ता.कळंब) या शेतकरी विधवा महिलेला उद्घाटनाचा मान देण्यात आला. त्यावेळी येडे यांचे तडाखेबाज भाषणही प्रचंड गाजले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या वर्षीच्या जानेवारीत यवतमाळात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी सामाजिक भान राखत साहित्यिकांनी जिल्ह्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवेला संमेलनाचे उद्घाटकपद बहाल करून पुरोगामी पाऊल उचलले होते. मात्र वर्षभरातच साहित्यिकांना त्या महिला उद्घाटकाचे विस्मरण झाले आहे. त्यामुळेच सध्या उस्मानाबादेत सुरू असलेल्या ९३ व्या संमेलनासाठी त्यांना निमंत्रण देणे तर दूरच साधा फोनही आला नाही.
यवतमाळच्या संमेलनाला सुरुवातीला नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांचे निमंत्रण नंतर वादात अडकले. ऐनवेळी वैशाली येडे (राजूर ता.कळंब) या शेतकरी विधवा महिलेला उद्घाटनाचा मान देण्यात आला. त्यावेळी येडे यांचे तडाखेबाज भाषणही प्रचंड गाजले होते. शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण महिलांचे खरे प्रश्न खऱ्या पोटतिडकीने मांडणाऱ्या वैशाली येडे यांना यंदा उस्मानाबादच्या मंचावर संधी मिळाली असती तर गेल्या एक वर्षातील प्रचंड वाढलेल्या शेती समस्येवरही त्यांनी जाब विचारला असता. मात्र यंदा त्यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. याची येडे यांच्यासह संपूर्ण जिल्हावासीयांना खंत आहे.
भेले असन थे...!
मांगच्या वर्षी साहित्याच्या स्टेजवरून मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. मांगच्यावेळीच एवढा गजर केला तं यंदा काय गजर करीन असं वाटलं असनं. साहित्यिक लोकं भेले असन...!
- वैशाली येडे, ९२ व्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक.