देशातील जनता अधिकारांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:00:16+5:30
गेल्या १६ दिवसांपासून उमरखेड येथे सीएए कायद्याविरुद्ध शाहीन बागच्या धर्तीवर कुल जमाती इत्तेहाद महाजतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनाला डॉ.कासिम रसूल इलियास यांनी संबोधित केले. त्यांनी या कायद्यामुळे केवळ मुस्लीमच नव्हेतर देशातील गरीब, मजूर, अशिक्षित, आदिवासी आदी प्रभावित होणार असल्याचे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड/दिग्रस : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना अधिकार बहाल केले. मात्र स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही जनता अधिकारांपासून वंचित असल्याचा आरोप मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते तथा वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.कासिम रसूल इलियास यांनी उमरखेड येथे नांदेड रोडवरील शाहीन बाग आंदोलनाला मार्गदर्शन करताना बुधवारी केला.
गेल्या १६ दिवसांपासून उमरखेड येथे सीएए कायद्याविरुद्ध शाहीन बागच्या धर्तीवर कुल जमाती इत्तेहाद महाजतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनाला डॉ.कासिम रसूल इलियास यांनी संबोधित केले. त्यांनी या कायद्यामुळे केवळ मुस्लीमच नव्हेतर देशातील गरीब, मजूर, अशिक्षित, आदिवासी आदी प्रभावित होणार असल्याचे सांगितले. सध्या देशातील केवळ एक टक्के लोकांजवळ ७४ टक्के तर ९९ टक्के लोकांकडे केवळ २४ टक्के साधनसंपत्ती आहे. एकतृतांश लोक उपासमारीने ग्रस्त आहे. देशात दर १२ मिनिटाला एक बलात्कार होत आहे. ४० टक्के लोक अशिक्षित आहे. त्यामुळे भारताच्या नवनिर्मितीसाठी संपूर्ण देशवासीयांनी सज्ज व्हावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.
दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता टाऊन हॉल प्रांगणातील धरणे आंदोलनाला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव फारूक अहेमद यांनी देशातील बहुजन, मूळ निवासींची छळवणूक, अन्याय, अत्याचार व असमानता ही नवीन बाब नसल्याचे स्पष्ट केले. हजारो वर्षांपासून अत्याचार सुरू आहे. महात्मा चार्वाक, महात्मा महावीर, महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवराय, सावित्रीबाई व ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रपिता महात्मा गांधी, दाभोलकर, कलबुर्गी, लंकेश या सर्वांची हत्त्या किंवा छळवणूक करण्यामागे विषारी विचारधारा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी गोविंद दळवी, प्रमोद राऊत, संजय खंडारे, नगरसेवक के.टी. जाधव, हरिदास मोगले, दीक्षा मोगले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी केली.