रूई येथील सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 05:00 AM2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:08+5:30
रुई येथे महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. या सभागृहासाठी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीनंतर रितसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र कंत्राटदार बांधकामासाठी दर्जाहिन विटा, वाळू व लोखंडाचा वापर करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. वाळू ऐवजी सर्रास चुरीचा वापर केला जात आहे. इतर साहित्यसुद्धा दर्जाहीन आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील रुई (मोठी) येथील महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्यात अनियमितता असल्याचा आरोप सरपंचासह ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.
रुई येथे महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. या सभागृहासाठी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीनंतर रितसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.
मात्र कंत्राटदार बांधकामासाठी दर्जाहिन विटा, वाळू व लोखंडाचा वापर करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. वाळू ऐवजी सर्रास चुरीचा वापर केला जात आहे. इतर साहित्यसुद्धा दर्जाहीन आहे.
याबाबत सरपंच राजेश हटकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे. या तक्रारीतून बांधकामाची गुणनियंत्रण विभागामार्फत त्वरित चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करावी, अशीही मागणी केली. सरपंच राजेश हटकर, विष्णूपंत यादव, श्रीरंग इंगोले, रमेश गोदमले, भीमराव ढगे, धनराज हटकर, आकाश खेकाडे, नारायण डहाणे, नरेश डहाणे, शिवराम गोदमले, साहेबराव मिरासे, सुभाष गोदमले, गजानन नांदे, किशोर यादव, शंकर गरडे, मनोज हाळसे, तुकाराम खंदारे, गजानन हजारे, आकाश काळे, प्रेम लावरे आदींसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गुणनियंत्रण विभागाकडे तक्रार केली आहे.
अधिकारी एकदाही फिरकले नाही
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत हे बांधकाम केले जात आहे. देवस्थानचे सभागृह असल्याने गावकऱ्यांना त्याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे गावकरी आपल्या परीने बांधकामाला हातभार लावत आहे. मात्र संबंधित अधिकारी एकदाही या बांधकामाकडे फिरकले नाही. अभियंत्यांनीसुद्धा भेट दिली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.