आर्णी हे शांतताप्रिय लोकांचे शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 06:00 AM2019-09-06T06:00:00+5:302019-09-06T06:00:19+5:30
आमदार ख्वाजा बेग यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. आर्णी शहराची परंपरा शांतताप्रिय आहे. आर्णीत राहणारे लोक चांगले असून त्यांचा चांगुलपणा वेळोवेळी सिद्धही झाला आहे, असे मत आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : येथील व्यापारपेठ पाहिल्यानंतर खात्री पटते की आर्णी हे शांतताप्रिय लोकांचे शहर आहे. येथे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहतात, असे गौरवोद्गार अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी काढले.
सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी हसन अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते. यावेळी आमदार ख्वाजा बेग यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. आर्णी शहराची परंपरा शांतताप्रिय आहे. आर्णीत राहणारे लोक चांगले असून त्यांचा चांगुलपणा वेळोवेळी सिद्धही झाला आहे, असे मत आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, आर्णी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे विलास राऊत, प्रहारचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे राजाभाऊ पद्मावार, प्रा. विनित माहूरे यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर प्रेस क्लबचे अध्यक्ष नौशाद अली, पत्रकार संघाचे अध्यक्ष मन्नान बेग, ठाणेदार यशवंत बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर शांततेसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित सर्वच नागरिकांनी दिले.
बैठकीला गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील, पत्रकार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तथा विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू बुटले यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र तिडके यांनी मानले.