तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 13:55 IST2026-05-04T13:45:59+5:302026-05-04T13:55:22+5:30
West Bengal Assembly Election 2026 Result: एकीकडे आकडेवारीतून पराभव निश्चित दिसत असतानाही तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाची आस सोडली नसल्याचे संकेत मिळत आहेत.

तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीच्या आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने १९० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाची गाडी १०० खालीच अडकली आहे. एकीकडे आकडेवारीतून पराभव निश्चित दिसत असतानाही तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विजयाची आस सोडली नसल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच ममता बॅनर्जी यांनी हळुहळू चित्र बदलेल आणि अखेरीस आपलाच विजय होईल. त्यामुळे मतमोजणी केंद्र सोडू नका, असा संदेश तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या होत असलेल्या पिछेहाटीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आवाहन करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आतापर्यंत काही फेऱ्यांचीच मतमोजणी झाली आहे. जसजशी मतमोजणी पुढे सरकेल तसा निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. त्यामुळे पक्षाच्या पोलिंग एजंटनी मतमोजणी केंद्रामधून हटू नये, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
तसेच आतापर्यंत केवळ १३ टक्के मतांची मोजणी झाली आहे. निवडणूक आयोग जाणीवपूर्वक संथगतीने मतमोजणी करत आहे. अनेक ठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आली आहे. म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रतिनिधींनी मतमोडजणी केंद्र सोडू नये, असेहेी ममता बॅनर्जींनी सांगितले आहे. तसेच भाजपाकडून निवडणूक प्रक्रियेत गडबड करण्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
জরুরি বার্তা pic.twitter.com/Uc82oihwEL
— Mamata Banerjee (@MamataOfficial) May 4, 2026
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमधील २९१ जागांचे कल समोर आले असून, त्यात भाजपाने १९२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर तृणमूल काँग्रेस ९४ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष ५ ठिकाणी आघाडीवर आहेत.