खाण पट्ट्यात शेतीचे झाले तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:02+5:30
उकणी व निवली येथील शेतकरी दौलत विठू सातपुते, बाळू रामचंद्र सातपुते, जनार्दन ताजने, भाऊराव ताजने, वासुदेव ताजने, नागोबा खिरटकर, संदीप ताजने, बापुराव ताजने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या शेताच्या काठावरच वेकोलिने उत्खनन केलेल्या मातीचे ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील खाणपट्यातील शेतकऱ्यांना वेकोलिच्या हेकेखोरीचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी वेकोलिने चुकीच्या पद्धतीने मातीचे डंपींग करून मातीचे ढिगारे उभारल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
निलजई येथील कोळसा खाणीच्या चुकीच्या माती डंपींगमुळे अनेक शेतात पावसाचे पाणी साचले असून शेताला आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतांमध्ये जवळपास कंबरभर पाणी साचले असून कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
यामध्ये उकणी व निवली येथील शेतकरी दौलत विठू सातपुते, बाळू रामचंद्र सातपुते, जनार्दन ताजने, भाऊराव ताजने, वासुदेव ताजने, नागोबा खिरटकर, संदीप ताजने, बापुराव ताजने या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या शेताच्या काठावरच वेकोलिने उत्खनन केलेल्या मातीचे ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. कपाशीचे पीक पूर्णत: पाण्याखाली आले असून ही पिके आता उद्ध्वस्त झाली आहेत.
वणी तालुक्यातील अहेरी, जुनाडा, पिंपळगाव, निलजई, तरोडा, निवली, बोरगाव, कोलगाव, मुंगोली, चिखली टाकळी या भागातही हिच परिस्थिती आहे. वेकोलिने ढिगारे उभे करताना पर्यावरणाचे सारेच नियम पायदळी तुडविले आहेत. ज्या जमिनी वेकोलिने संपादित केल्या नाहीत, त्या शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. शेती केली, तर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे पिक घेता येत नाही. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांना छळत आहे.
तक्रारी करूनही वेकोलिचे कानावर हात
वेकोलिच्या मग्रुरीने खाण पट्टयातील शेतकरी कमालिचे त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकरी वारंवार तक्रारी करतात. परंतु शेतकऱ्यांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. या हंगामात खाणपट्टयातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. वेकोलिने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी उकणीच्या माजी सरपंच संगीता खाडे यांनी केली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.