५०० कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर ‘रिलीज’

By Admin | Updated: January 13, 2017 01:31 IST2017-01-13T01:31:45+5:302017-01-13T01:31:45+5:30

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल््यातील २२ शाळांमधील ५०० कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून थांबवून ठेवले.

500 employees' salary finally 'release' | ५०० कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर ‘रिलीज’

५०० कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर ‘रिलीज’

मुख्याध्यापक कात्रीतच : शिक्षकांची उपसंचालकांकडे धाव
यवतमाळ : माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल््यातील २२ शाळांमधील ५०० कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून थांबवून ठेवले. या अन्यायग्रस्त शिक्षकांनी विमाशीच्या थेट शिक्षण उपसंचालकांकडे धाव घेतल्यानंतर अखेर त्यांचे वेतन अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
२०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील खासगी माध्यमिक विद्यालयातील १२४ शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यांचे समायोजन ज्या शाळांमध्ये करण्यात आले होते, तेथील संस्थाचालकांनी समायोजनच अमान्य केले. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना तेथे अद्यापही रूजू होता आलेले नाही. अशा संस्थाचालकांबाबत कठोर भूमिका घेताना शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या शाळांमधील संपूर्ण कर्मचाऱ्यांचेच वेतन गोठविले. २२ शाळांमधील ५०० कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात या शाळांमधील कर्मचारी आणि अतिरिक्त शिक्षकांनी ७ जानेवारीला धरणे आंदोलन केले. त्यानंतर थेट अमरावती येथे शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली. अखेर ५०० कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याची कार्यवाही माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. या आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, विभागीय कार्यवाह एम. डी. धनरे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जीवतोडे आदींनी पुढाकार घेतला. दरम्यान, कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होत असले तरी संबंधित मुख्याध्यापकांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 500 employees' salary finally 'release'