भाव मिळेना, २० रुपयांत विकावे लागताहेत आठ किलो टरबूज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 10:59 AM2021-05-31T10:59:53+5:302021-05-31T11:00:02+5:30

Agriculture News : शेतकऱ्यांना २० रुपयांत आठ किलो टरबूज विकण्याची वेळ आली आहे.

Farmers have to sell eight kilos of watermelon just for 20 rupees! | भाव मिळेना, २० रुपयांत विकावे लागताहेत आठ किलो टरबूज!

भाव मिळेना, २० रुपयांत विकावे लागताहेत आठ किलो टरबूज!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कामरगाव : यंदा शेतकऱ्यांना नानाविध संकटाला सामोरे जावे लागत असून, कडक निर्बंध असल्याने कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांना २० रुपयांत आठ किलो टरबूज विकण्याची वेळ आली आहे.

सततच्या पावसाने मागील वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने खरिपातील तोटा रबीत भरून काढावा या उद्देशाने सिंचनाची सोय असलेल्या कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. त्यासाठी शेतीमशागतीपासून बियाणे व खते, खरेदी तसेच पुढील मशागतीसाठीही खर्च केला. बाजारात टरबुजाची विक्री करण्याच्या वेळी कोरोनाचा संसर्ग वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने तसेच आठवडी बाजार बंद करण्यात आले. परिणामी, टरबुजाची विक्री थांबली.

सुरुवातीला प्रतिकिलो दराने होणारी टरबुजाची विक्री नगावर येऊन पोहोचली. आणि त्याही पुढे जाऊन आजमितीला २० रुपयांत (दोन, अडीच किलोचे एक टरबूज) चार टरबूज विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

यामुळे शेतकरी गारद झाला आहे. आजमितीला टरबूज विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतून लागवड खर्च निघणेही कठीण झाले आहे. संचारबंदी, कडक निर्बंधाचा सर्वाधिक फटका भाजीपाला व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसला. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर भाजीपाला सडल्याचे, याशिवाय टरबुजाची विक्री न झाल्याने टरबूज रस्त्यावर फेकून दिल्याचे प्रकार यापूर्वी कामरगाव परिसरात घडले आहेत. भाजीपाला व टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनाही शासनाने अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.

 

Web Title: Farmers have to sell eight kilos of watermelon just for 20 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.