टॉवर उभारणीला आता अडथळा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:17+5:30
जिल्ह्यात रिलायंन्स जीओ कंपनीकडून ४ जी टॉवर व एजी २ ऑफीसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.या बांधकामाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर बऱ्याच अडचणी येत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोबाईल टॉवर बांधकाम परवानगी देण्या संबंतधात उप विभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मोबाईल टॉवर बांधकाम परवानगी दिल्यानंतर मोबाईल कंपनी बांधकामाला सुरुवात करु शकतात. त्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतीने मोबाईल कंपनीच्या टॉवर बांधकामाला अडथळा आणू नयेत, अशा सूचना मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
जिल्ह्यात रिलायंन्स जीओ कंपनीकडून ४ जी टॉवर व एजी २ ऑफीसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे.या बांधकामाकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगीही देण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर बऱ्याच अडचणी येत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे. त्यामध्ये शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायत अंतर्गत आलोडी येथील सर्वे क्रमांक ४५/१ मधील प्लॉट क्रमांक ३२, ३३, ३४, ३५ वर एजी २ आॅफीसचे बांधकाम असून या बांधकामामध्ये स्थानिक रहिवासी अडथळा निर्माण करत असल्याची तक्रार कंपनीने केली आहे.
तसेच काही ग्रामपंचायतींकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासही टाळाटाळ होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिवांची बैठक बोलावून मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी टॉवरच्या बांधकाम कोणताही अडथळा न अणता आपणास काही अडचणी असेल तर त्याची संविधानीक मार्गाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.
टॉवरमुळे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा नागरिकांचा गैरसमज आहे. याबाबत भारत सरकारने दिलेल्या पत्रानुसार जागतिक आरोग्य संघटनांच्या विविध सर्वेक्षणावरुन निघालेल्या निष्कर्षानुसार माबाईल टॉवर व लहरीचा आरोग्यावर दुष्परिणाम होत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ही बाब स्थानिकांच्या लक्षात आणून देत टॉवर उभारणीच्या कामातील अडथळा दूर करण्याच्या सूचनाही ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.