अवकाळीचा जिल्ह्यातील ७० गावांना तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:28+5:30
डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गार केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात १० व ११ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल ७० गावांना तडाखा दिला. यात १ हजार ७०८ हेक्टरवरील गहू, चणा, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला.
डिसेंबर आणि जानेवारीत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. यात खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले. रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त असतानाच १० व ११ मार्च रोजी परत जिल्ह्याला वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गार केले.
यात शेतातील काढणीला आलेले गहू आणि चण्याचे प्रचंड नुकसान झाले. गहू पीक भुईसपाट झाले. तर मजुरांअभावी शेतातच असलेला कापूसही खराब झाला. वादळीवारा आणि पावसामुळे ६१ गावांत अंशत: घरांची पडझड झाली. तर दोन ठिकाणी जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले.
अवकाळी पावसामुळे वर्धा तालुक्यातील ३२ गावांत १ हजार ३२३ हेक्टर, सेलू तालुक्यातील एका गावात ६५ हेक्टर आर., देवळी तालुक्यातील २६ गावांत ८० हेक्टर आर., हिंगणघाट तालुक्यातील सात गावांत १४० हेक्टर आर. तर समुद्रपूर तालुक्यातील चार गावांत १०० हेक्टरवरील शेतपिकांची मोठी हानी झाली. वादळवाºयामुळे एक व्यक्ती जखमी झाली तर एका जनावराचा मृत्यू झाला.
वर्धा, देवळी तालुक्यात सर्वाधिक नुकसान
मंगळवारी आणि बुधवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वर्धा आणि देवळी तालुक्यातील अनुक्रमे ३२ आणि २६ गावांत शेतपिकांचे नुकसान झाले. प्राथमिक अहवालाच्या आधारे नुकसान झालेल्या शेतपिकांचे शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकऱ्यांना मदतीकरिता जिल्हा प्रशासनाला अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गारपीट, वादळवाऱ्यामुळे पिकांचे नुकसान
वर्धा : १० मार्चला सायंकाळी वादळवाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे तरोडा आणि तळेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील गहू, चणा, कापूस, भाजीपाल्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले. पिकांचे सर्वेक्षण करीत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उज्ज्वला देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली. संबंधित गावात यावेळी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडुरंग देशमुख, पंचायत समिती सदस्य सुभाष चांभारे, संगीता मेहत्रे, तरोड्याच्या सरपंच शुभांगी चांभारे, मदनीचे सरपंच ललित कुरेकर, येसंबाचे सरपंच सत्यपाल भगत, गोजीच्या सरपंच शुभांगी गणोरे, सोनेगावचे सरपंच धनपाल भस्मे, भानखेड्याचे सरपंच विलास भालकर, धोत्र्याचे सरपंच उज्ज्वला गुरनुले, एकुर्लीच्या सरपंच लता हिंगे, नेरीचे सरपंच यशवंत गावंडे, भूगावच्या सरपंच दुर्गा थूल, श्रीकांत पाल, शोभा वानखेडे, सतीश धोटे, मनीषा मानकर, मनीषा वानखेडे महादेव धोपटे आदी उपस्थित होते.