आजनसरा-फुकटा मार्गाला झुडपांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 05:00 AM2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:01+5:30
आजनसरा ते फुकटा मार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ फूट उंचीचे झुडपी गवत वाढल्याने नागमोडी वळणावर वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरात रोही, जंगली डुक्कर, माकडं या प्राण्यांची मोठी संख्या आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गाने प्रवास करताना हे वन्यप्राणी झुडपी गवतातून रस्त्यावर येत असल्याने वाहनांना धडक बसून अनेक वाहन चालक जखमी होऊन वाहनाचे सुद्धा नुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आजनसरा : आजनसरा ते वडनेर हा मार्ग भोजाजी महाराजांच्या तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. हा मार्ग अत्यंत अरुंद व एकेरी असल्याने नागमोडी वळणे आहेत. या मार्गाच्या दुतर्फा झाडा झुडपांनी विळखा घातला असून त्यामुळे समोरुन येणारे वाहनं दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
आजनसरा ते फुकटा मार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ फूट उंचीचे झुडपी गवत वाढल्याने नागमोडी वळणावर वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरात रोही, जंगली डुक्कर, माकडं या प्राण्यांची मोठी संख्या आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गाने प्रवास करताना हे वन्यप्राणी झुडपी गवतातून रस्त्यावर येत असल्याने वाहनांना धडक बसून अनेक वाहन चालक जखमी होऊन वाहनाचे सुद्धा नुकसान होत आहे. रात्रीच्या सुमारास प्रवास करताना आजूबाजूचे काहीच दिसत नसल्याने अथांग पोकळीतून वाहन चालवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपी गवत कापून रस्ता प्रवाशांसाठी मोकळा करुन देण्याची मागणी भोजाजी महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तक्रारीकडे दुर्लक्ष...
आजनसरा येथील भोजाजी महाराज देवस्थानात दुरदुरुन भाविक दर्शनासाठी येतात. आजनसरा ते फुकटा मार्गावर वळणरस्ता असून या मार्गाच्या दुतर्फाा वाढलेल्या झुडपी गवतांमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नाही. परिणामी, अनेक वाहनांचे अपघात झाले असून अनेक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करुन झाडे तोडण्याची मागणी केली. मात्र ग्रामपंचायतीने या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. एखाद्याचा जीव गेल्यावरच ग्रामपंचयतीला व बांधकाम विभागाला जाग येणार का, असा प्रश्न परिसरातील संतप्त नागरिकांसह शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. हा रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात येत आहे.