बोगस बियाणे विक्रीप्रकरणी कृषी केंद्राचा परवाना रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:17+5:30
शेतकरी शितल चौधरी यांनी एका कृषिसेवा केंद्रातून ६५ बियाण्यांचे बॅग खरेदी केले.पण, बियाणे उगविलेच नसल्याने शेतकºयाचे लाखोंचे नुकसान झाले. कृषिमंत्री दादाजी भूसे यांची भेट घेत त्यांच्यापुढे शेतकऱ्यांची व्यथा मांडली असता त्यांनी कृषिकेंद्र चालक, निर्माता व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देत परवाना रद्द करून दुकान सील करण्याबाबत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गोविंदपूर येथील शेतकरी शितल चौधरी यांना बोगस बियाणे देत फसवणूक केल्याप्रकरणी कृषी केंद्रचालकाचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे यांच्या नेतृत्त्वात कृषिमंत्री दादाजी भूसे यांना निवेदनातून करण्यात आली.
शेतकरी शितल चौधरी यांनी एका कृषिसेवा केंद्रातून ६५ बियाण्यांचे बॅग खरेदी केले.पण, बियाणे उगविलेच नसल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले. कृषिमंत्री दादाजी भूसे यांची भेट घेत त्यांच्यापुढे शेतकऱ्याची व्यथा मांडली असता त्यांनी कृषिकेंद्र चालक, निर्माता व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देत परवाना रद्द करून दुकान सील करण्याबाबत सांगितले. परंतु, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विभागीय महासंचालकांकडून अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. येत्या १५ दिवसात पीडित शेतकऱ्याला मोबदल्याच्या स्वरुपात न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
बियाण्यांसह तणनाशकही निघू लागले बोगस
अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले असून सोयाबीनची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला. त्यातच आता शेतकऱ्यांनी शेतात तणनाशकाची फवारणी केली असता त्याचा काहीही उपयोग झाला असून वाढलेले तण जैसे थेच असल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे मात्र, कृषीविभागाचे डोळे बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे.
बथदिवे, वीजखांब बसविण्याची मागणी
वडनेर : वडनेर गाव हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून गावातून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे.महामार्गाच्या दोन्ही बाजूला गाव वसलेले आहे. पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर काळोख असतो. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अंधारात रस्ताच दिसत नसल्याने अनेकांचे अपघातही झाले आहे. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होवू नये, यासाठी महामार्गालगत पथदिवे आणि विद्युत खांब लावण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वीजबिल माफ करा; दिलीप अग्रवाल यांची मागणी
लॉकडाऊनच्या काळात छोटे-मोठे उद्योग धंदे बंद असल्याने नागरिकांचा रोजगारही हिरावला. अशा परिस्थितीत नागरिकांना कुटुंबाचा गाडा चालविणेही कठीण झाले होते. अशा विवंचनेत असतांना नेहमी पेक्षा तिप्पट वीज देयक आल्यामुळे नागरिकांना अवाजवी वीज देयके भरणे शक्य नाही. आधीच लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या हाताला काम नाही, सर्व दैनदिन व्यवसाय ठप्प आहेत. ठप्प असलेले सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी नागरिकांना ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे नागरिकांचे वीजबिल माफ करण्याची मागणी दिलीप अग्रवाल यांनी प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे.