Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 07:06 IST2026-04-25T07:05:32+5:302026-04-25T07:06:15+5:30
Bhandup Tragedy: भांडुप परिसरात एका साध्या ‘हाय’ आणि टाटा बाय-बायमुळे सुरू झालेला वाद थेट भीषण अपघातात बदलल्याची घटना समोर आली.

Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भांडुप परिसरात एका साध्या ‘हाय’ आणि टाटा बाय-बायमुळे सुरू झालेला वाद थेट भीषण अपघातात बदलल्याची घटना समोर आली आहे. या वादात लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात कोसळले. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर ८ जण जखमी झाले. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी श्रद्धा डेव्हलपर्स या विकासकाविरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा नोंदविला आहे. रिक्षाचालक गणेश फल्ले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. फल्ले यांचा मुलगा भालचंद्र (२५) याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री मातेश्वरी हॉल येथे लग्न समारंभ संपल्यानंतर बाहेर पडलो. त्यादरम्यान भालचंद्र याच्या मित्राच्या बहिणीला कोणीतरी अनोळखी व्यक्तीने हाय व टाटा बाय बाय केला.
नेमके काय घडले?
गुरुवारी रात्री मातेश्वरी हॉलमागील बाजूस सुरू असलेल्या लग्नसमारंभात एका मुलीची छेड काढण्यावरून वाद झाला. छेड काढणाऱ्या अनोळखी मुलाला पकडण्यासाठी काहीजण त्यांच्या मागे गेले, तर भालचंद्र फल्ले हा श्रद्धा कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत शिरला. तेथे एका लाकडी फळीने तसेच पत्र्याने झाकलेली बांधकामाधीन साईटवर ड्रेनेजची टाकी होती. या २० फूट खोल टाकीसाठी खणलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात भालचंद्र त्यात कोसळला. त्याला या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी त्या तरुणाचा पाठलाग करत असताना श्रद्धा डेव्हलपर याच्या बांधकाम साईटच्या ड्रेनेजच्या टाकीमध्ये भालचंद्र पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मित्र श्रेयस सुर्वे, ऋषिकेश कदम, अनिकेत पाटील, आदित्य आहेर, मंकंत जुवाटकर गेले तेही खाली कोसळले. ते ज्या प्लॅटफॉर्मवर उभे होते तो तात्पुरता स्वरूपात बांधण्यात आला होता. सर्वांच्या वजनाने तो प्लॅटफॉर्म तुटून सगळेजण खाली कोसळले. या घटनेत एकूण लग्नातील ६ व्यक्ती व तीन बांधकाम कामगार असे ९ जखमी झाले. तर महापालिकेने १० जण जखमी व एकाचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
जखमींची नावे
अनिकेत पाटील (वय २१), श्रेयस सुर्वे (२५), ऋषिकेश कदम (२५), आदित्य आहेर (२५), संकेत जुवाटकर (२५) यांच्यासह कामगार जयदत्त शहा (२१), अंकित कुमार रॉय (१९), मजूर हरिशंकर पासवान (२५) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर मुलुंडसह विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
स्लॅब कोसळल्याच्या चर्चेने खळबळ
रात्री घटना घडल्यानंतर इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या चर्चेने खळबळ उडाली. घटनेची वर्दी लागताच पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ बाहेर काढत खासगी तसेच सरकारी रुग्णालयात दाखल केले.
डेव्हलपर्स विरुद्ध गुन्हा दाखल
चौकशीत लग्नासाठी आलेल्या ग्रुपमधील एका मुलीला समोरील तीनजणांच्या ग्रुपमधील मुलाने हात दाखवून ‘हाय’ केला. त्यावरून वाद झाला. यामध्ये नेमका घटनाक्रम समजून घेण्यात येत आहे. मृताच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपावरून श्रद्धा डेव्हलपर्स विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ७