विलगीकरणासाठी प्रवाशांची तब्बल चार तास ताटकळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:19+5:30
जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. विमान, रेल्वे किंवा बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश आहे. बाहेर जिल्ह्यातून वर्धा शहरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरी जाण्यापूर्वी सामान्य रुग्णालयात तपासणी करुन नंतरच क्वारंटाईन व्हावे लागतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याबाहेरुन शहरात आलेल्यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य तपासणी करणे बंधनकारक केले आहे पण; सामान्य रुग्णालयात तपासणीकरिता नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची नेहमीच ओरड होत आली आहे. आजही मुंबई व पुण्यावरुन आलेल्यांना तब्बल चार तास ताटकळत राहावे लागले. त्यामुळे त्यांनी सामान्य रुग्णायालयातील आरोग्य व्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कडक अंमलबजावणी सुरु झाली आहे. विमान, रेल्वे किंवा बस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर त्यांना सुरुवातीचे सात दिवस संस्थात्मक तर नंतरचे सात दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश आहे. बाहेर जिल्ह्यातून वर्धा शहरात प्रवेश केल्यानंतर त्यांना घरी जाण्यापूर्वी सामान्य रुग्णालयात तपासणी करुन नंतरच क्वारंटाईन व्हावे लागतात. रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांना थेट रुग्णालयात पोहोचविण्यासाठी तेथे प्रशासनाकडून वाहनाची व्यवस्था केली आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका परिवारातील पाच व्यक्ती मुंबई आणि दोघे पुण्याहून आले.
या सातही जणांना सामान्य रुग्णालयात तपासणीकरिता नेले. रात्रभर प्रवास करुन आलेले हे सर्व व्यक्ती आरोग्य तपासणीकरिता उपाश्यापोटी बसून राहिले.रुग्णालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना वारंवार तपासणी करण्याची विनंती केल्यानंतरही त्यांना तब्बल दीड वाजतापर्यंत बसवून ठेवले. त्यानंतर यातील एकाने उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली. त्यानंतर लगेच यासर्वांची विचारपूस करुन त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारुन त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्राकडे रवाना केले. सामान्य रुग्णालयातील त्यांना आलेल्या या अनुभवामुळे त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.
जिल्हा सामान्य रुग्णालयात असा प्रकार होऊच शकत नाही. बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांच्या तपासणीकरिता चोविस तास व्यवस्था करण्यात आली आहे. आजही सकाळी साडेदहा वाजतापासून त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित होते. आलेल्यांची तपासणी करुन त्यांना लगेच गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविले जातात. कधीकधी वाहन उपलब्ध नसले तर थोडा विलंब होऊ शकतो.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.