उद्योगांमध्ये शासन निर्णयाची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:11+5:30
उद्योग असलेल्या ठिकाणी तेथील ८० टक्के नागरिकांना रोजगार उपलब्ध करून १८ नोव्हेंबर १९६८ चा शासनाचा निर्णय आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही उद्योगात शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून नियम धाब्यावर बसविले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिकांचा हक्क डावलून मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचा भरणा करण्यात आला आहे. याकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने गुरुवारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली.
उद्योग असलेल्या ठिकाणी तेथील ८० टक्के नागरिकांना रोजगार उपलब्ध करून १८ नोव्हेंबर १९६८ चा शासनाचा निर्णय आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही उद्योगात शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही. येथील बेरोजगारांना अन्य जिल्ह्यात रोजगार शोधावा लागत आहे. लोकप्रतिनिधींकडूनही या प्रश्नावर आग्रही भूमिका घेतली जात नसल्याने कंपनी व्यवस्थापनांचा कारभार आलबेल सुरू आहे. जिल्ह्यात उत्तम व्हॅल्यू स्टील इंडस्ट्रीज, भूगाव यासह देवळी तालुक्यात उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्थानिकांची संख्या अल्प असून परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ११ सप्टेंबरला मोर्चा काढण्याचा इशारा अॅड. उज्ज्वल काशीकर, राकेश पांडे, समीर राऊत आदींनी निवेदनातून दिला आहे. मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज येथून सुरुवात होणार असून बजाज चौक, इंझापूर असे मार्गक्रमण करून उत्तम स्टील व्हॅल्यू उद्योगावर धडक देत व्यवस्थापकांना निवेदन सादर केले जाणार आहे.