गांधीवाद्यांना आत्मचिंतनाची गरज

By Admin | Updated: December 21, 2015 02:22 IST2015-12-21T02:22:10+5:302015-12-21T02:22:10+5:30

स्वातंत्र्य चळवळीतील बापूंचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे विचार व तत्व जगासाठी प्रेरणादायी आहे. गांधीवादी बापूंच्या विचार व कार्याचे काम करीत असले तरी आज आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

The Gandhians need self-centeredness | गांधीवाद्यांना आत्मचिंतनाची गरज

गांधीवाद्यांना आत्मचिंतनाची गरज

लक्ष्मीनर्सिम मूर्ती : गांधीजींच्या सहवासातील आठवणी केल्या ताज्या
दिलीप चव्हाण सेवाग्राम
स्वातंत्र्य चळवळीतील बापूंचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे विचार व तत्व जगासाठी प्रेरणादायी आहे. गांधीवादी बापूंच्या विचार व कार्याचे काम करीत असले तरी आज आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण जगालाच बापूंच्या सत्य अहिंसा या तत्वांचा अंगिकार करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत ९६ वर्षीय लक्ष्मीनर्सिम मूर्ती यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
लक्ष्मीनर्सिम मूर्ती १९४४ साली गांधी आश्रमात बापूंना भेटण्यास आले होते. स्वातंत्र्यानंतर ते आता प्रथमच आश्रमात आलेत. आश्रमातील २१ दिवसांचे स्मरण, बापूंचे कार्य आणि दैनिक कार्यक्रमाची आठवण करून त्यांनी स्मृती जागविल्या. मूळचे श्रूगेशी जि. चिकमंगलूर, कर्नाटक येथील शिक्षणासाठी ते शिमोग या ठिकाणी गेले. १९३० मध्ये गांधीजी आणि सहकाऱ्यांनी मिठाचा कायदा मोडून स्वातंत्र्य चळवळीला प्रारंभ केला. देशात गांधीजींच्या कार्याची माहिती गावोगाव कार्यकर्ते आणि पत्रकाद्वारे पोहोचवू लागले. गांधीजींच्या कार्याची माहिती मलाही होऊ लागली. काँग्रेसचे नेते पट्टा सितामैय्या यांचे भाषण मी ऐकले. यातून गांधीजींचे विचार व कार्य लक्षात आले. बापूंविषयी जेवढे ऐकता येईल तेवढा माझा प्रयत्न होता. १९४१ च्या भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देश सहभागी झाला. मी तर खूपच भारावून गेलो होतो. प्रभावित झालो होतो. बापू, बा व सहकाऱ्यांच्या अटकेमुळे दुखी झालो. बापूंना भेटावे, पाहावे, ही इच्छा मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना भेटण्याचा निर्णय घेऊन मी कुणालाच न सांगता सेवाग्राम आश्रम गाठले. ते साल होते १९४४, असे मूर्ती यांनी सांगितले.
दोन दिवस आश्रमात फिरलो. प्रार्थनेत सहभागी झालो. २१ दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. आश्रमातील व्यवस्था, स्वच्छता, आत्मियता आजही कायम असून त्याच पद्धती कायम ठेवल्याने आनंद झाला. कार्यकर्ता या आश्रमातून घडला पाहिजे. भ्रष्ट राजकारण, हिंसा याला थारा देणाऱ्या व वाढविणाऱ्या व्यक्ती, युवकांपर्यंत गांधी विचार व कार्य पोहोचविले पाहिजे, असे मूर्ती म्हणाले.

Web Title: The Gandhians need self-centeredness