दारूच्या वादातून मित्राने केला मित्राचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 AM2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:06+5:30
राजेश गुप्ता आणि सागर शंकर कांबळे (२५) हे दोघेही बाजारात हमालीचे काम करतात. शुक्रवारी ते दोघेही अमरावती येथे काही कामानिमित्त गेले होते. दरम्यान तेथे दोघांमध्ये दारु पिण्याच्या कारणातून वाद झाला. या वादात सागरने राजेशला शिवीगाळ केल्याची माहिती आहे. दोघांमध्येही शाब्दीक वाद झाला. शुक्रवारीच रात्री ते पुलगाव येथे आले. शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सागर आणि राजेशमध्ये पुन्हा वाद झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : जुन्या वादातून व्यक्तीच्या पोटावर, गळ्यावर चाकूने वार करीत हत्या करण्यात आली. हरिरामनगर वॉर्ड १२ येथील सिमेंट रस्त्यावर शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दारु पिण्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा गावात सुरु आहे. राजेश उर्फ बाबुलाल गुप्ता (३५) रा. हरिरामनगर असे मृतकाचे तर सागर कांबळे असे आरोपीचे नाव असल्याचे पुलगाव पोलिसांनी सांगितले. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
राजेश गुप्ता आणि सागर शंकर कांबळे (२५) हे दोघेही बाजारात हमालीचे काम करतात. शुक्रवारी ते दोघेही अमरावती येथे काही कामानिमित्त गेले होते. दरम्यान तेथे दोघांमध्ये दारु पिण्याच्या कारणातून वाद झाला. या वादात सागरने राजेशला शिवीगाळ केल्याची माहिती आहे. दोघांमध्येही शाब्दीक वाद झाला. शुक्रवारीच रात्री ते पुलगाव येथे आले. शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सागर आणि राजेशमध्ये पुन्हा वाद झाला. अमरावती येथे झालेल्या वादाचा वचपा काढून सागरने राजेश गुप्ता यांच्या गळ्यावर, पाठीवर, पोटावर चाकूने सपासप वार केले. रक्तबंबाळ स्थितीत राजेश गुप्ता जमिनीवर कोसळला.
रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या राजेशला पाहून परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, राजेशचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच ठाणेदार यांच्या पथकातील विवेक बन्सोड, राजेंद्र हाडके, प्रदीप काटे आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव, ठाणेदार राजेंद्र गायकवाड यांनी येत बारकाईने पाहणी केली. पोलिसांनी सागर कांबळे याला अटक केली असून त्याने नाल्यात फेकलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
हमालीच्या पैशावरुन होत होता वाद
मृत राजेश गुप्ता आणि आरोपी सागर कांबळे हे दोघे बाजारात हमालीचे काम करायचे. दोघांनाही दारु पिण्याचे व्यसन होते. दोघांमध्ये नेहमीच हमालीच्या पैशाच्या कारणातून वाद व्हायचा. त्यातूनच सागरने राजेशचा काटा काढून त्यास संपविले.