व्यापाऱ्यांचा शेतमाल यार्डात शेतकऱ्यांचा रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 06:00 AM2019-11-05T06:00:00+5:302019-11-05T06:00:16+5:30
व्यापाऱ्यांचा शेतमाल मार्केट यार्डात टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांना मात्र शेतमाल रस्त्यावर टाकावा लागला आहे. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पाऊस येण्याची शक्यता असल्याने विक्रीसाठी आणलेला शेतमालही पाण्याने भिजण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे धोरण नेहमीच व्यापारीधार्जिणे राहिले आहे. शेतकºयांच्या हिताची जपवणूक करण्याऐवजी नेहमीच व्यापारी हित जोपासणाऱ्या बाजार समितीने पुन्हा एकदा शेतकºयांना अडचणीत आणले आहे.
व्यापाऱ्यांचा शेतमाल मार्केट यार्डात टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांना मात्र शेतमाल रस्त्यावर टाकावा लागला आहे. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पाऊस येण्याची शक्यता असल्याने विक्रीसाठी आणलेला शेतमालही पाण्याने भिजण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
येथील बाजार समितीचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीतून बाजार समिती प्रशासनाला चांगले उत्पन्न मिळते. मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा सुरळीत राहत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करताना दिसतात. मागील आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने मार्केट यार्डात शेतमाल ठेवणे गरजेचे आहे. मात्र, यार्डात व्यापाऱ्यांच्या शेतमालाची पोती ठेवून आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आपला शेतमाल रस्त्यावर इतरत्र टाकावा लागतो.
अचानक पाऊस आल्यास शेतमाल भिजत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल टाकण्याकरिता शेड आहे. असे असताना यावर व्यापाऱ्यांनीच कब्जा केल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट असल्याचे या परिसरात फेरफटका मारल्यावर आढळून आले. याकडे बाजार समिती प्रशासनाचा कानाडोळा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
समितीतील ओट्याला शेडची प्रतीक्षा
बाजार समितीत लगतच्या ग्रामीण भागातून शेतमाल आणला जातो. आवक वाढल्यानंतर यार्ड आणि खुली जागाही अपुरी पडते. याकरिता काही वर्षांपूर्वी भला मोठा ओटा तयार करण्यात आला. मात्र, त्यावर कित्येक वर्षांपासून शेड उभारण्यात आले नाही. ओट्यावर गवताचे पीक आले असून कचऱ्यांने विळखा घातल्याचे दिसून येते. स्वच्छतेकडे बाजार समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.