४० गावांत ६५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 06:00 AM2019-09-09T06:00:00+5:302019-09-09T06:00:24+5:30
कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्व्हेत ४० गावांचा समावेश असून शेतकरी संख्या ७२० आहे. या सततच्या पावसाने कपाशीचे पीक पिवळे पडले असून पात्या गळून पडल्या आहे. अतिपाण्याने तूर पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या पावसाने तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : मागील पंधरवड्यापासून आर्वीसह तालुक्यात संततधार पावसाने कहर केल्याने तालुक्यातील ४० गावांतील ६५९ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीचा आर्वीसह तालुक्यातील बाजारवाडा, नांदपूर, खुबगाव, अहमदपूर, लाडेगाव, एकलारा, शिरपूर, देऊरवाडा, लाडेगाव, सर्कसपूर, राजापूर, अहिरवाडा, मारोडा, धनोडी, वर्धमनेरी, मांडला, सावळापूर, दहेगाव (मु.), हरदोली, रोहणा, वडगाव (पांडे), गुमगाव, नांदोरा, पाचेगाव, धनोडी, कवाडी, गव्हाणखेडी, पिंपळखुटा चिंचोली (डांगे), पाचोड, टाकरखेड, जळगाव, वाढोणा, निंबोली (शेंडे), इठलापूर, वागदा, वाढोणा, अल्लीपूर, टोणा आदी गावांना फटका बसला आहे. यात नदीकाठच्या शेतातील पिके पुराच्या पाण्याने खरडून गेल्याने नुकसानीची आकडेवारी अधिक आहे. कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५९ हेक्टर मधील कापूस, सोयाबीन, तूर, फळवर्गीय पिके आदींचा समावेश आहे. कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्व्हेत ४० गावांचा समावेश असून शेतकरी संख्या ७२० आहे. या सततच्या पावसाने कपाशीचे पीक पिवळे पडले असून पात्या गळून पडल्या आहे. अतिपाण्याने तूर पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या पावसाने तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे. कृषी विभागाने पाठविलेल्या शेतपिकाच्या नुकसानीच्या सर्व्हेत वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे आर्वी तालुक्यातील ४० गावांतील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.
- प्रशांत गुल्हाणे, तालुका कृषी अधिकारी, आर्वी.