विज्ञानाच्या नियमांनुसार जड वस्तू पाण्यात बुडतात आणि हलक्या वस्तू तरंगतात. पण उत्तर प्रदेशातील एका अशा रहस्यमयी ठिकाणी विज्ञानाचे हे सर्व नियम फेल ठरताना दिसतात. सीतापूर जिल्ह्यातील गोमती नदीच्या किनारी असलेले 'रुद्रावर्त कुंड' सध्या भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या कुंडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इथे अर्पण केलेली सफरचंद, केळी यांसारखी जड फळे पाण्यावर तरंगतात, मात्र अत्यंत हलकी असलेली शंकराची प्रिय बेलपत्रे थेट तळाला जाऊन विसावतात.
काय आहे हे रहस्य?
उत्तर प्रदेशातील नैमिषारण्याजवळ असलेल्या या पवित्र रुद्रावर्त कुंडाचा अनुभव एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. स्थानिक भाविकांच्या मते, हे भगवान शिवाच्या प्रसादाचे स्वरूप आहे. जेव्हा भक्त इथे फळे अर्पण करतात, तेव्हा ती पाण्यावर तरंगू लागतात. जी फळे तरंगतात, ती प्रसाद म्हणून परत घेतली जातात. मात्र, जेव्हा बेलपत्र किंवा दूध अर्पण केले जाते, तेव्हा दूध पाण्यात न मिसळता थेट खाली जाते आणि बेलपत्रेही क्षणात पाण्यात बुडते. असे मानले जाते की, महादेव स्वतः पाताळात राहून या वस्तूंचा स्वीकार करतात.
पाताळात आहे महादेवाचे वास्तव्य
पौराणिक कथांनुसार, या ठिकाणी भगवान शिव पाताळ लोकी निवास करतात. विशेष म्हणजे, या मंदिरात कोणत्याही प्रकारची मूर्ती किंवा शिवलिंग डोळ्यांना दिसत नाही. हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली असल्याचे मानले जाते. जेव्हा आकाश स्वच्छ असते आणि पाणी नितळ असते, तेव्हा कुंडाच्या तळाशी नंदी महाराजांची पांढऱ्या रंगाची मूर्ती स्पष्टपणे दिसून येते. गजबजलेल्या शहरांपासून दूर असलेल्या या शांत ठिकाणी आल्यावर एका वेगळ्याच आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव येतो.
विज्ञान काय सांगते?
विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, वस्तूंचे तरंगणे हे त्यांच्या घनतेवर अवलंबून असते. सफरचंद किंवा केळी यांसारख्या फळांमध्ये छोटे पोकळ भाग असतात, ज्यामुळे ही फळे पाण्यावर तरंगू शकतात. याउलट, बेलपत्राची रचना अशी असू शकते की ती पाणी लवकर शोषून घेतात आणि खाली जातात. मात्र, भाविकांच्या श्रद्धेपुढे हे तर्क फिके पडतात. एकाच वेळी फळांचे तरंगणे आणि पानांचे बुडणे हे दृश्य पाहताना विज्ञानापेक्षा श्रद्धेचा भाग अधिक मोठा वाटू लागतो.
कसे पोहोचायचे?
जर तुम्हाला या चमत्कारी कुंडाला भेट द्यायची असेल, तर उत्तर प्रदेशातील लखनौपासून हे ठिकाण साधारण ७५ ते ८० किमी अंतरावर आहे. विमानाने जाणार असाल तर, लखनौचे चौधरी चरण सिंग विमानतळ सर्वात जवळ आहे. रेल्वेने जाणार असाल तर, सीतापूर रेल्वे स्टेशनवरून तुम्ही टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने इथे पोहोचू शकता. ऑक्टोबर ते मार्च हा काळ इथे जाण्यासाठी सर्वोत्तम आहे.
निसर्गाचे गुढ आणि अध्यात्माचा संगम असलेल्या या रुद्रावर्त कुंडाला एकदा अवश्य भेट द्यायला हवी. काही गोष्टींचे उत्तर विज्ञानाकडे नसते, त्या फक्त अनुभवायच्या असतात, हेच इथे गेल्यावर जाणवते.
Web Summary : Uttar Pradesh's Rudravart Kund defies science. Fruits float, while bel leaves sink, believed due to Lord Shiva's presence in the underwater temple. Nandi's idol visible when water is clear. A spiritual experience awaits near Lucknow.
Web Summary : उत्तर प्रदेश का रुद्रावर्त कुंड विज्ञान को चुनौती देता है। फल तैरते हैं, जबकि बेलपत्र डूब जाते हैं, माना जाता है कि भगवान शिव के पानी के नीचे स्थित मंदिर में होने के कारण ऐसा होता है। पानी साफ होने पर नंदी की मूर्ति दिखती है। लखनऊ के पास एक आध्यात्मिक अनुभव।