दिल्ली येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा ठाणे पोलिसांनी घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:01 AM2019-09-20T00:01:28+5:302019-09-20T00:07:14+5:30

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकातील महिला पोलिसांनी आस्थेने चौकशी करुन कल्याणच्या मुरबाड रोडवरील नवज्योत ट्रस्ट या संस्थेतील १६ वर्षीय मुलीला तिच्या दिल्ली येथील आई वडीलांच्या नुकतेच ताब्यात दिले आहे. ठाणे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल दिल्ली पोलिसांनीही कौतुक केले आहे.

Thane  Police search for missing girl from Delhi | दिल्ली येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा ठाणे पोलिसांनी घेतला शोध

महिला पोलिसांनी केली आस्थेने चौकशी

Next
ठळक मुद्देआई, वडील आणि सामाजिक संस्थेच्या दिले ताब्यातक्षुल्लक कारणावरून सोडले होते घर महिला पोलिसांनी केली आस्थेने चौकशी

ठाणे : दिल्लीतील मनियारी नरेला भागातील राजीव कॉलनी येथून वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय मुलीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. या मुलीची ओळख पटवल्यानंतर तिला मंगळवारी आईवडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील हरविलेल्या तसेच अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलीकडेच दिले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, उपनिरीक्षक कैलास सोनवणे तसेच महिला पोलीस शिपाई माधुरी जाधव, तेजश्री शेळके, वंदना पोटफोडे आणि नीलम पाचपुते यांच्या पथकाकडून अशा बेपत्ता मुलामुलींचा शोध घेण्याचे काम सुरू होते. यावेळी माधुरी जाधव आणि तेजश्री शेळके यांनी कल्याणच्या मुरबाड रोडवरील नवज्योत ट्रस्ट या संस्थेत जाऊन संचालकांकडे याबाबत चौकशी केली. दिल्ली येथील १६ वर्षीय मुलगी या संस्थेत दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. सुरुवातीला या मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने कोणतीही माहिती दिली नाही. महिला पोलिसांनी तिची दोन, तीनवेळा भेट घेऊन तिला विश्वासात घेतले. तेव्हा जुलै २०१८ मध्ये दिल्लीच्या राजीव कॉलनी येथून घरातील कोणालाही काहीएक न सांगता निघून आल्याची कबुली तिने दिली. तिला सामाजिक कार्यकर्त्याने उल्हासनगरच्या बालकल्याण समितीच्या आदेशाने भिवंडीतील सनराइज हॅप्पीहोम बालसुधारगृहात जुलै २०१८ मध्ये दाखल केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून तिला मुरबाडच्या नवज्योत ट्रस्ट येथे ठेवण्यात आले होते. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असता, ९ जुलै २०१८ रोजी नरेला (दिल्ली) पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. तिच्या आईवडिलांशीही संपर्क साधून ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, १७ सप्टेंबर २०१९ रोजी उल्हासनगर बालकल्याण समितीच्या आदेशाने तिला तिचे आईवडील तसेच सामाजिक संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. आईवडील आपल्यापेक्षा धाकट्या भावाला जास्त जीव लावतात, असा समज झाल्याने तिने घरातून निघून जाण्याचे पाऊल उचलल्याचेही तिने सांगितले. या तपासात महिला शिपाई माधुरी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. गोपनीयतेच्या कारणास्तव या मुलीचे नाव जाहीर करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Thane  Police search for missing girl from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.