स्मार्टफोन वापरत नसतानाही बॅटरी का संपते? 'ही' धक्कादायक कारणं वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:52 IST2026-01-18T15:51:50+5:302026-01-18T15:52:14+5:30
Smartphone Battery : बॅटरी ड्रेन होण्यामागे केवळ स्क्रीनचा वापर हे एकमेव कारण नसून, पडद्यामागे घडणाऱ्या अनेक हालचाली तुमच्या फोनची ऊर्जा शोषून घेत असतात.

स्मार्टफोन वापरत नसतानाही बॅटरी का संपते? 'ही' धक्कादायक कारणं वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
अनेकदा आपण अनुभवतो की, रात्री फोन १०० टक्के चार्ज करून ठेवला आणि सकाळी उठून पाहिलं तर बॅटरी आपोआप कमी झालेली असते. आपण तर फोनला हातही लावला नसतो, मग ही बॅटरी जाते कुठे? बॅटरी ड्रेन होण्यामागे केवळ स्क्रीनचा वापर हे एकमेव कारण नसून, पडद्यामागे घडणाऱ्या अनेक हालचाली तुमच्या फोनची ऊर्जा शोषून घेत असतात. ही कारणं इतकी साधी आहेत की ती समजल्यावर तुम्हीही डोकं धरून बसाल!
१. नेटवर्क सिग्नलशी सुरू असलेली कुस्ती
तुमच्या बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे कमकुवत नेटवर्क. जर तुमच्या भागात मोबाईल रेंज कमी असेल, तर तुमचा फोन सतत टॉवर शोधण्यासाठी धडपडत असतो. ही प्रक्रिया बॅटरीवर प्रचंड ताण देते. विशेषतः ५जी नेटवर्क शोधण्यासाठी फोनला सर्वाधिक ताकद लागते, तर वाय-फायवर फोन सर्वात कमी बॅटरी खर्च करतो. त्यामुळे रेंज नसेल तर बॅटरी वेगाने संपणार हे नक्की!
२. बॅकग्राउंडमध्ये चालणारा छुपा खेळ
आपण एखादं ॲप वापरून बंद केलं तरी ते पूर्णपणे थांबत नाही. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सॲप यांसारखी अनेक ॲप्स बॅकग्राउंडमध्ये डेटा सिंक करत असतात. तुम्ही फोन वापरत नसतानाही ही ॲप्स सक्रिय राहून बॅटरीचा फन्ना उडवतात. जे ॲप्स तुम्ही रोज वापरत नाही, त्यांची बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटी सेटिंगमध्ये जाऊन रिस्ट्रिक्ट करणे हाच यावर उपाय आहे.
३. नोटिफिकेशन्सचा सारखा प्रकाश
मोबाईलचा डेटा ऑन असेल तर दिवसभरात शेकडो नोटिफिकेशन्स येतात. जरी आपण फोन उघडून बघितला नाही, तरी प्रत्येक नोटिफिकेशन आल्यावर फोनचा डिस्प्ले १०-१५ सेकंदांसाठी ऑन होतो. ही छोटीशी गोष्ट दिवसभरात तुमच्या बॅटरीचा मोठा हिस्सा खर्च करते.
४. जुनाट सॉफ्टवेअर आणि अपडेट्सचा अभाव
जर तुमच्या फोनमधील सॉफ्टवेअर किंवा ॲप्स अपडेट नसतील, तर त्यामध्ये बग्स अर्थात तांत्रिक दोष असू शकतात. हे दोष फोनच्या प्रोसेसरवर अनावश्यक लोड देतात आणि बॅटरी गरम होऊन डिस्चार्ज होऊ लागते. म्हणूनच फोन आणि ॲप्स नेहमी अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे.
५. साध्या उपायाने वाचवा बॅटरी
तज्ज्ञांच्या मते, फोनची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा फोन रिस्टार्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे बॅकग्राउंडमध्ये अडकलेल्या नको असलेल्या प्रोसेस थांबतात आणि बॅटरीचे आयुष्य वाढते. त्यामुळे पुढच्या वेळी फोनची बॅटरी आपोआप संपली तर फोन खराब झालाय असं समजण्यापूर्वी या गोष्टी तपासून पाहा.