पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
By अनंत खं.जाधव | Updated: April 24, 2026 11:04 IST2026-04-24T11:04:07+5:302026-04-24T11:04:34+5:30
Sawantwadi Unseasonal Rain News:

पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील काहि भागात अवकाळी पावसाने हाहाकार उडवून दिला असून सावंतवाडी आंबोली परिसरात तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सावंतवाडी शहरात तर गुरूवारी रात्री १२ च्या सुमारास वीजांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्यांमुळे झाडं पडण्यासह इमारती वरच्या पत्र्याच्या शेड उडून गेल्याचे प्रकार घडले. सुदैवाने यात कोणाला गंभीर इजा झाली नाही.मात्र नुकसानीचा आकडा मोठा असल्याचे दिसून येत आहे.शुक्रवार सकाळ पासून मध्यरात्री झालेल्या नुकसानीची दृश्ये समोर येत असून अनेकांच्या घरावर पत्रेच राहिले नसल्याचे दिसत आहे.
सावंतवाडी तालुक्यात गुरूवारी सायंकाळपासून वीजांचा लखलखाट सुरू होता. सात ते आठ वाजण्याच्या सुमारास आंबोलीत जोरदार पाऊस कोसळला. यातच रात्री १२ च्या सुमारास शहरात वादळी वाऱ्याने थैमान घातले. या वाऱ्यात मोती तलाव, राजवाडा, शिव उद्यान परिसरातील झाड पडण्यासह रामेश्वर प्लाझा येथील पत्र्याचे छत उडून गेले. एसपीके कॉलेजच्या परिसरात हे छत उडून पडले. सुदैवाने यात कोणाला गंभीर इजा पोहचली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रात्री जवळपास २ तास विद्युत पुरवठा देखील खंडीत होता. शहरात आणखीनही काही ठिकाणी या वाऱ्याने नुकसान केल्याचे समजते. नुकतीच नगरपरिषद. कडून पत्र्याच्या शेडबाबत तपासणीची सुचना देण्यात आलेली असताना रामेश्वर प्लाझा येथील छत उडून गेल्याने मोठा अपघात घडला. सुदैवाने हे छत मोती तलावा समोरील भागात न कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, पंचम खेमराज महाविद्यालयाचे यात मोठे नुकसान झाले आहे. जुन्या इमारतीच कौलारू छत तसेच नवीन इमारतीचे पत्रे तुटून पडला आहे. वाऱ्याचा वेग एवढा होता की तीन मजली इमारत ओलांडून काही पत्रे थेट कॉलेजच्या मागील बाजूला जाऊन पडले. रामेश्वर प्लाझा येथील काचीच्या खिडक्या फुटून नुकसान झाले. राजवाडा येथील नारळाचे झाड पडून संरक्षक कठड्याचे व शिव उद्यानमधील झाडाचे नुकसान झाले. उभाबाजर येथील छाताचा पत्रा शेजारील इमारतीच्या अंगणात जाऊन पडला. आरपीडीच्या जाहिरात कमानीचही नुकसात झाले. सुदैवाने ही घटना रात्रीच्यावेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे.महसूल विभागाकडून शुक्रवार सकाळ पासून पाहाणी करण्याचे काम सुरू असून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.