कोकणचा ‘हापूस’ संकटात! देवगडच्या बागायतदारांचे पालकमंत्र्यांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:31 IST2026-02-06T18:29:34+5:302026-02-06T18:31:38+5:30
हवामान बदल आणि रोगांच्या विळख्याने शेतकरी हवालदिल; तातडीने मदतीची मागणी

कोकणचा ‘हापूस’ संकटात! देवगडच्या बागायतदारांचे पालकमंत्र्यांना साकडे
देवगड : देवगड हापूसवर यंदा निसर्गाचा कोप झाला असून, आंबा बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड’च्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य मांडले. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातील आशादायक चित्र आता पूर्णपणे पालटले असून, बागायतदारांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष विलास रूमडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना निवेदन दिले. गेल्या १० वर्षांतील ही सर्वांत भीषण परिस्थिती असल्याचे सांगत, खत-फवारणीचा खर्चही निघणे कठीण झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. थंडीतील लहरीपणा आणि वाढता कीड प्रादुर्भाव यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
निसर्गाचा लहरीपणा
थंडीच्या दिवसांत कमाल व किमान तापमानातील तफावत १० अंशांपेक्षा अधिक राहिल्याने फळधारणेवर विपरीत परिणाम झाला. मादी फुलांऐवजी नरफुलांचे प्रमाण वाढल्याने पीक हातचे गेले आहे.
किडींचा दुहेरी हल्ला
मोहोरासोबत पालवी आल्याने आधी ‘तुडतुड्यांचा’ प्रादुर्भाव झाला आणि आता पुन:मोहोरावर ‘थ्रीप्स’ (फुलकीड) या घातक किडीने हल्ला केला आहे. यामुळे उरलेली आशाही मावळली आहे.
खर्चाचा डोंगर वाढला
कीटकनाशके, मजुरी आणि खतांवरील खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. अनेक फवारण्या करूनही रोगावर नियंत्रण मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे भांडवल पाण्यात गेले आहे.
बागायतदारांनी व्यक्त केली भीती
हवामानातील बदलांमुळे आंबा शेती आता ‘जुगार’ ठरत आहे. जर शासनाने वेळेत आर्थिक बळ दिले नाही आणि कीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आंबा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती विलास रूमडे यांनी व्यक्त केली आहे.