आईची सेवा न करणं ठरलं जीवघेणं; जीवन संपवलेल्या सूरजची मन हेलावून टाकणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:39 IST2026-03-18T17:39:13+5:302026-03-18T17:39:34+5:30
चिठ्ठीमुळे उलगडली मनातील ‘सल’

आईची सेवा न करणं ठरलं जीवघेणं; जीवन संपवलेल्या सूरजची मन हेलावून टाकणारी कहाणी
दत्ता यादव
सातारा : आई-वडील जिवंत असताना त्यांची काळजी घेतली नाही, तर नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागतो, याचे हृदय पिळवटून टाकणारे उदाहरण साताऱ्यात घडले आहे. आई जिवंत असताना तिची योग्य काळजी घेतली नाही, याची तीव्र खंत मनात बाळगणाऱ्या एका तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही करुण कहाणी रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळे गावचा २९ वर्षीय सूरज सुबारे याची आहे.
सूरज सुबारे हा लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. आईच्या आधारावर त्याचे आयुष्य पुढे जात होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी आईचेही निधन झाल्यानंतर तो पूर्णपणे एकटा पडला. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सूरजने कामाच्या शोधात साताऱ्यात येण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यातील चिमणपुरा पेठेमध्ये भाड्याची खोली घेऊन तो वास्तव्य करत होता. पगारही त्याला फारसा नव्हता. पैसे वाचविण्यासाठी काटकसर करून तो रोजचा दिवस पुढे ढकलत होता; पण मनातून तो नाराज असायचा.
त्याला त्याच्या आईची फार आठवण यायची. आई हयात असताना तिची काळजी घेतली नाही, याची सल त्याच्या मनात सतत बोचत होती. नकळत आईच्या तब्येतीकडे त्याच्याकडून झालेले दुर्लक्ष त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. कामावरून घरी आल्यानंतरही तो फारसा आजूबाजूच्या लोकांशी बोलायचा नाही. फक्त आई आणि आई, हेच दोन शब्द त्याचे आपल्या कंपनीतील मित्रांसोबत बोलताना बाहेर पडायचे. असं त्याचे सहकारी मित्र सांगताहेत.
‘त्याची’ चिठ्ठी मन हेलावून टाकणारी...
सूरज शनिवारी कामावर गेला नाही. आज आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असं समजून त्यानं आईसाठी चिठ्ठी लिहिली. माझी आई मला सोडून गेली. आई हयात असताना आईची काळजी घेतली असती तर आज माझ्यासोबत आई असती. मला आयुष्याचा आता कंटाळा आलाय. माझ्यामुळे कोणाला त्रास नको. माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. मी स्वत: आत्महत्या करत आहे, असा मजकूर चिठ्ठीत लिहून सूरजने गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतला.
यातून समाजासाठी एकच संदेश
आज आपण समाजामध्ये पाहातो. संपत्तीसाठी काही मुले आई-वडिलांना घराबाहेर काढतात. तर काही मुले आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात; पण जेव्हा आई-वडील हयात नसतात. तेव्हाच त्यांची किंमत कळते; पण तोपर्यंत वेळ गेलेला असतो. कदाचित, सूरजलाही हीच जाणीव झाली असेल. आई हयात असताना तिची काळजी घेतली असती तर आज माझ्यासोबत माझी आई असती, असं त्याला सांगावं लागलं. या घटनेतून समाजासाठी एकच संदेश जातो तो म्हणजे आई-वडील हयात आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा.