धुराच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थ एकवटले !

By Admin | Updated: November 27, 2014 00:10 IST2014-11-26T23:17:57+5:302014-11-27T00:10:56+5:30

कारंडवाडी : कारखाना बंद करण्याचा इशारा साताऱ्याचा भोपाळ नको !

Grassroots gathered for the smoke! | धुराच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थ एकवटले !

धुराच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थ एकवटले !

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमधील भीमेश्वर इस्तात कंपनीतून येणाऱ्या धुराविषयी प्रशासन व संबंधित कंपनीधारकाला कल्पना व निवेदन देऊन देखील याविषयी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. उलट याविषयी ग्रामस्थांना धमकावले जात असल्याने येथील कारंडवाडीच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा कारखाना बंद करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला दिली.मागील सहा महिन्यांपासून या कारखान्यातून काजळी, धूर स्वरूपात कार्बन बाहेर पडत आहे. कधी पांढरा धूर तर कधी काळा धूर या कंपनीतून बाहेर फेकला जात आहे. या धुरामुळे जवळपास पाच किलोमीटर अंतरावरील वस्तीला त्रास सोसावा लागत आहे. तर विहिरीचे पाणी काजळी पडून खराब होत आहे. तर जनावरांना लावण्यात आलेला कडबा व ऊस पिकावरही याचा परिणाम होऊ लागला आहे. या कारखान्याविरोधात गावकरी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)

धुरामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. पूर्वी एकराला ऊस पन्नास टन निघत होता. आता तीस टनापर्यंत आला आहे. तर ज्वारीच्या पिकावरही रोगराई होत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे, तर काही मोठी वृक्ष वटायला लागले आहेत.
-संदीप काशीद (शेतकरी)

कारखान्याचे पाणी ओढ्यात सोडल्याने गावातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक विहिरींतील पाणी काजळ पडून खराब झाले आहे, तर या विहिरीतील पाणी जनावरेही पीत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- बजरंग देशमुख (कारंडवाडी, ग्रामस्थ)

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
या कारखान्यातील धूर हा कारंडवाडी, देगाव, महाडिक, वायकर, वनश्री कॉलनी, भाटवस्ती या भागात पसरत आहे. जवळपास या कारखान्याच्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत हा धूर त्रासदायक ठरत आहे.
- संतोष साळुंखे (माजी सरपंच, कारंडवाडी)

धुरामुळे पिकांचे नुकसान होत आहे. उसावर काजळी पडल्याने उसाची उंची खुंटली आहे व वजनही भरत नाही. तर उसामध्ये आंतरपीक घेतलेले ज्वारीचे पीक हे खास करून जनावरांना कडबा म्हणून वापरला जातो; परंतु या काजळीमुळे जनावरे कडबाही खात नाहीत. त्यामुळे आमचे उत्पन्न घटले आहे.
- आनंदराव साळुंखे (शेतकरी)

कारखान्याचा धूर आणि ओढ्यात सोडलेले पाणी यामुळे आरोग्याचा त्रास जाणवत आहे. ओढ्याच्या पाण्यामुळे विहिरीचे पाणीही दूषित झाले आहे. धुरामुळे रस्ताच दिसत नाही. पावसाळ्यात कारखान्याने ओढ्याचे पाणी आडविल्याने अनेक वावरे वाहून गेली, तर रस्ताही खराब झाला आहे.
-सुधीर साळुंखे (देगाव ग्रामस्थ)

Web Title: Grassroots gathered for the smoke!