लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामात सर्वच घटकांनी चांगली कामगिरी बजावली आहे. येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अक्षय्यतृतीयेला कारखान्याच्या ऊसतोडणी, वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली. वाहतूक कंत्राटदारांना करारपत्राचे वितरण करत असल्याची माहिती यशराज देसाई यांनी दिली.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२ ऊसतोडणी, वाहतूक करारास अक्षय्य तृतीयेदिवशी यशराज देसाई यांच्या हस्ते ऊस वाहतूक कंत्राटदार यांच्याकडे करारपत्र सुपूर्द केले. यावेळी चेअरमन अशोकराव पाटील, अध्यक्ष पांडुरंग नलवडे, कार्यकारी संचालक सुहास देसाई, विनायक देसाई, रवींद्र चौगुले, नवनाथ साळुंखे, यादवराव तिकुडवे, भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.
यशराज देसाई म्हणाले, ‘कारखान्याच्या या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या उसाचे गाळप पूर्ण करण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम कारखाना व्यवस्थापनाने सुरू केले आहे. कारखान्यात अनेक अत्यावश्यक असे तांत्रिक बदल केले आहेत.
कारखान्याची ओव्हर ऑईलिंगची कामे त्याचबरोबर मशिनरीमधील आवश्यक त्या दुरुस्तीची व सुधारणांची कामे चालू करण्यात आलेली आहेत. यापुढील काळातही अनेक तांत्रिक आणि आधुनिक बदल करून त्याचा जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या गळीत हंगामामध्ये आपल्याला होईल.’