Satara: चोरट्यांची नजर आता शेतीपंपाच्या केबलवर, दहा ते बारा लाखांच्या केबल केल्या लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:48 IST2026-03-12T17:47:42+5:302026-03-12T17:48:07+5:30
शेतकरी आले मेटाकुटीस

Satara: चोरट्यांची नजर आता शेतीपंपाच्या केबलवर, दहा ते बारा लाखांच्या केबल केल्या लंपास
कातरखटाव : खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदायिनी ठरत असलेल्या येरळा तलावातून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या दहा ते बारा लाखांच्या केबल चोरीस गेल्यामुळे आणि वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे येरळवाडी, बनपुरी, तुपेवाडी, वडूज, कातरखटाव (रानमळा) या गावांतील शेतकरी ऐन उन्हाळ्यात चांगलेच मेटाकुटीस आले आहेत.
येरळवाडी गावाच्या हद्दीतील येरळानगर बरड शिवारात बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीपंप आहेत. या शेतीपंपाला महागड्या विद्युत केबल होत्या. तलावातील कृषिपंप का चालू होत नाही, अशी शंका आल्यानंतर केबल तुटल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. गेल्या दोन वर्षांपासून अशा घटना घडत असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आणि गाऱ्हाणे मांडले.
ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देणे गरजेचे असल्याने आणि अशा वारंवार घटना घडत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहत आहे. या घटनास्थळाला वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली.
कुणाची शंभर मीटर तर कुणाची दोनशे मीटर केबल चोरीस गेली आहे. तर कुणाची दोन ते अडीच लाखांची ऐन उन्हाळ्यात केबल चोरीला गेल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे हा प्रश्न पडला आहे. यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. काही शेतकऱ्यांचे कृषिपंप पाण्याबाहेर काढून केबल चोरण्यात आली आहे. -संतोष बागल, शेतकरी, कातरखटाव, रानमळा