मुंबई गुजरातशी जोडण्याचा मोदींचा घाट

By Admin | Updated: October 9, 2014 00:18 IST2014-10-08T21:58:56+5:302014-10-09T00:18:13+5:30

जयंत पाटील : भाजपवर टीकास्त्र-- आमदारकीसाठी पक्षातून बाहेर पडले

Modi Ghat to connect Gujarat with Gujarat | मुंबई गुजरातशी जोडण्याचा मोदींचा घाट

मुंबई गुजरातशी जोडण्याचा मोदींचा घाट

सांगली : मुंबईवर गुजरातचा पहिल्यापासूनच डोळा होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विकासात्मक कामाऐवजी ते मुंबई गुजरातला जोडण्याच्या प्रयत्नात आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू केली आहे. आता तर भाजपला स्वबळावर महाराष्ट्राची सत्ता पाहिजे, ती केवळ महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठीच, अशी टीका माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याने महाराष्ट्रात राष्ट्रवादीलाच स्पष्ट बहुमत मिळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. या राजधानीवर नरेंद्र मोदींचा डोळा असल्यामुळेच त्यांनी देशाचा कारभार बाजूला ठेवून महाराष्ट्रात प्रचारासाठी तळ ठोकला आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, हेच कळत नाही. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव भाजपच्या नेत्यांचा आहे. त्यांचा हा हेतू महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने धोक्याचा असल्यामुळे मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. महाराष्ट्रात अन्य पक्षांपेक्षा राष्ट्रवादीची शक्ती जास्त असल्यामुळे नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत शरद पवार यांच्यावर आरोप करीत आहेत. त्यांच्या टीकेने आम्हाला काही फरक पडत नाही. राज्यातील ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रवादीनेच सोडविले असल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल.
जिल्ह्यातील पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार आहेत, असा दावाही पाटील यांनी केला. (प्रतिनिधी)

आमदारकीसाठी पक्षातून बाहेर पडले
राष्ट्रवादीतून जे बाहेर पडले, ते केवळ स्वार्थासाठी आणि आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडले आहेत. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याचा त्यांना पश्चाताप होईल. पक्षातून नेते बाहेर पडले असले तरी, कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत, अशी टीका त्यांनी दिनकर पाटील यांच्यावर केली.

Web Title: Modi Ghat to connect Gujarat with Gujarat