रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणात झिरो वेस्टेज अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST2021-05-11T04:33:10+5:302021-05-11T04:33:10+5:30

रत्नागिरी : काेरोनावरील लसीकरण मोहिमेत डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा ...

Zero Waste Campaign in Vaccination in Ratnagiri District | रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणात झिरो वेस्टेज अभियान

रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरणात झिरो वेस्टेज अभियान

रत्नागिरी : काेरोनावरील लसीकरण मोहिमेत डोस वाया जाण्याचे प्रमाण अधिक असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी ‘झिरो वेस्टेज’ अभियान हाती घेतले आहे.

कोरोनावरील लसीच्या व्हायलमधील जादाची मात्रा लाभार्थ्यांसाठी वापरली जाणार असून, लसीकरण केंद्रावर १० जण उपस्थित असतील तरच व्हायल फोडाव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच व्हायलमधील जादा मात्रेमुळे अधिक लोकांना लस देता येणार असल्याचे डॉ. जाखड यांनी यावेळी सांगितले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे सुरुवातीला लस घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन नोंदणीही हाऊसफुल्ल होत असल्याने लोकांची धावपळ उडत आहे. सध्या मागणी जास्त आणि लस कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला व्हायल फोडल्यानंतर लाभार्थी कमी असल्यामुळे डोस वाया जात होते. व्हायल फोडल्यानंतर ते चार तासच वापरू शकतो. डोस वाया जाण्याचे प्रमाण दोन ते तीन टक्के होते. सध्या ते एक टक्क्यापेक्षाही खाली आले आहे. हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांच्या सूचनेनुसार ‘झिरो वेस्टेज’ अभियान आखण्यात आले आहे. केरळमध्ये हे अभियान राबविण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात काही ठिकाणी सुरू आहे. रत्नागिरीतही त्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. एका व्यक्तीला मात्रा देताना सिरीनमध्ये ०.५ मिली लस भरली जाते. हे करीत असताना एखाद दुसरा थेंब वाया जाण्याची शक्यता असते. कोविशिल्ड लसीच्या व्हायल बनवताना १० टक्के अधिक मात्रा कंपनीतून ठेवण्यात आल्या आहेत. अनेक वेळा एका व्हायलमध्ये १० जणांना मात्रा दिली की एक मात्रा शिल्लक राहते. ती मात्रा वाया जाते. शिल्लक मात्रेचा वापर जादा व्यक्तीसाठी केला तर वाया जाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण राहील आणि लोकांना लस देता येईल, असा विचार करूनच लसीकरण केंदांना सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Zero Waste Campaign in Vaccination in Ratnagiri District