अरुण आडिवरेकररत्नागिरी : दिवसाची सुरूवात असो, प्रमोशनचा आनंद असो, नव्या खरेदीचे सेलिब्रेशन असो किंवा अगदी कंटाळा असो या प्रत्येक गोष्टीत कॉमन गोष्ट एकच असते, ती म्हणजे चहा. दिवस सुरू करण्यापासून झोपेपर्यंत कुठल्याही वेळी चालू शकणारी गोष्ट म्हणजे चहा.थंडीने हात कुडकुडत असताना वाफाळता कप हातात धरताना, मुसळधार पाऊस पडत असताना मित्रांसोबत टपरीवर कटींग पिताना येणारी मजा औरच. रत्नागिरी शहरालाही चहाचे हे कौतुक आहेच. म्हणून तर फक्त चहाची स्पेशल ठिकाणे रत्नागिरीत ठाण मांडू शकली आहेत.
रत्नागिरी शहरात हॉटेल आणि वडापावच्या टपऱ्यांवर होणारी चहाची विक्री कितीतरी मोठी आहेच, पण या स्पेशल चहावाल्यांकडे दररोज ५,१७०हून अधिक कप चहा संपतो. यानुसार फक्त स्पेशल चहातूनच रत्नागिरीत जवळपास साडेपंधरा लाखांची उलाढाल होते.गेल्या वर्ष-दीड वर्षात रत्नागिरीच्या बाजारापासून ते अगदी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर तब्बल २० ठिकाणी असा स्पेशल चहा मिळतो.
पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात मिळणारा वेगवेगळ्या चवीचा चहा आता रत्नागिरीतही मिळू लागला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर या भागातून विशेष मसाले मागवून हा चहा तयार होतो. रत्नागिरीत सुरू झालेल्या चहाच्या नव्या दालनांमध्ये मिळणाऱ्या चहाची चव मात्र वेगवेगळीच आहे. लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या या व्यवसायाने अनेकांच्या हाताला रोजगारही मिळून दिला आहे.स्वस्त आणि झटपटकमी खर्चात उपलब्ध होणारा व्यवसाय म्हणजे चहा. स्वस्तात झटपटपणे चहाची उपलब्धता करता येते. बाजारात चहाप्रेमींची संख्या कमी नाही, त्यामुळे चहाची दुकानेही वाढू लागली आहेत. कमी मनुष्यबळातही हा व्यवसाय करता येत असल्याने या व्यवसायाकडे अनेकजण वळले आहेत.