कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला दोन हजार ५०० लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:37 IST2021-04-20T23:37:17+5:302021-04-20T23:37:28+5:30

आदेशाचा गैरफायदा घेत मोडले नियम

Two thousand five hundred wedding bars were blown up showing Corona | कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला दोन हजार ५०० लग्नांचा बार

कोरोनाला वाकुल्या दाखवत उडाला दोन हजार ५०० लग्नांचा बार



निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते; परंतु कोरोना जसाजसा कमी होऊ लागला तसतशी टाळेबंदी शिथिल करण्यात आली होती. लग्नसमारंभाला मंजुरी देण्यात आली. ५० लोकांच्या आतच लग्न समारंभ करा, असे आदेश शासन, प्रशासनाने दिले; परंतु या आदेशाचा गैरफायदा घेत लग्नाचा बारच फुटला. सुरुवातीला काहींनी परवानगी घेतली; मात्र आता ५०० ते ८०० लोकांच्या गर्दीत लग्न समारंभ केले गेले.
सध्या लग्नाचे मुहूर्त असल्याने दररोज लग्न समारंभ उरकण्यात आले. ना तिथी, ना कोरोनाची भीती यात लग्न समारंभ झाल्याने यातूनच कोरोनाचा उद्रेक झाला. जिल्ह्यातील गावांपैकी असा एकही गाव शिल्लक नाही ज्या गावात या वर्षभरात लग्न झाले नसेल. जोमाने लग्न समारंभ पार पाडण्यात आले. डिजे, ढोल यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत लग्न करण्यात आले.
जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात एकही दिवस नाही की लग्न झाली नाहीत. त्यामुळे लग्न समारंभातून कोरोनाचा उद्रेक होऊ लागला. परिणामी, आज कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिक आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामुळे  चिंता आणि भीती वाढली आहे.
जिल्ह्यात झाली २१५ रजिस्टर लग्न
कोरोनाच्या काळात कमी पैशात लग्न करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे, तसेच जिल्ह्यातील २१५ नव दाम्पत्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न केले आहे. कोरोनामुळे नगरिकांनी सध्या कमी खर्चात, कमी लोकांत लग्न करणे पसंत केले.

एप्रिल कठीणच 
गेल्या वर्षापासून यंदाच्या मार्च महिन्यापर्यंत झालेल्या लग्न समारंभामुळे कोरोनाचा उद्रेक झाला. ही परिस्थिती सावरणे आता एप्रिल महिन्यात कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात ४ तारखेपासूनच सरकारने कडक निर्बंध लावले. त्यानंतर १५ एप्रिलपासून संचारबंदी लावली, तरीही लोक लग्न समारंभ करीतच आहेत.

मंगल कार्यालयचालकांच्या प्रतिक्रिया
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लग्न समारंभात वऱ्हाड्यांची घालून दिलेली अट ही मंगल कार्यालयात लग्न करण्यासाठी कारणीभूत ठरली. कमी लोकांत लग्न करायचे असेल तर मंगल कार्यालयात का लग्न करावे, असे लोकांना वाटले. मंगल कार्यालयात थाटामाटाने लग्न न करता घरीच लग्न करण्यात आले, त्यामुळे लावलेली रक्कम निघाली नाही.
- मंगेश कोर्लेकर
कोरोनाच्या संसर्गामुळे दरवर्षीच्या तुलनेत अर्धे लग्न समारंभही आमच्याकडे झाले नाहीत. ५0 लोकांच्या आतच लग्न आटोपण्याचा सरकारचा आदेश असल्याने लोकांनी मंगल कार्यालयात लग्न करण्यापेक्षा घरीच लग्न करणे पसंत केले. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला आहे.
- राकेश थळे

Web Title: Two thousand five hundred wedding bars were blown up showing Corona

टॅग्स :marriageलग्न