होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पूर्णपणे खुली झाल्यामुळे भारतीय तेल कंपन्यांसह आयातदार आणि निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर इराणनं हा मार्ग बंद केला होता. जगातील २० टक्के तेल आणि सुमारे एक तृतीयांश गॅस याच मार्गावरून जात असल्यानं जगभरात खळबळ उडाली होती. मात्र, आता हा मार्ग खुला झाल्यानं जगानं सुटकेचा निश्वास सोडला असून, भारताकडे येणारी ४१ जहाजे आता होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडण्यास सज्ज आहेत.
४१ जहाजे भारताकडे येण्यास सज्ज
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या जहाजांमध्ये कच्चं तेल, एलपीजी, खते आणि एलएनजी भरलेलं आहे. यामध्ये २६ परदेशी आणि १५ भारतीय जहाजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे डझनभर जहाजांमध्ये खतं असून, आगामी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी भारताला याची नितांत गरज आहे. भारतीय जहाजांपैकी १० जहाजांमध्ये कच्चं तेल, ४ मध्ये एलपीजी आणि ३ मध्ये एलएनजी आहे. हा मार्ग खुला झाल्याच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी घसरण झाली.
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण
शुक्रवारी ब्रेंट क्रूड ९ टक्क्यांहून अधिक घसरून ९०.३८ डॉलर प्रति बॅरलवर बंद झालं. व्यवहारादरम्यान ही घसरण ११.५ टक्क्यांपर्यंत (८७.९ डॉलर) गेली होती. तसंच अमेरिकन बेंचमार्क डब्ल्यूटीआय क्रूड ११.४५ टक्क्यांनी घसरून ८३.८५ डॉलरवर आलं. गेल्या ९ दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत ३० टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
होर्मुज ओलांडण्याच्या प्रतीक्षेत असलेली जहाजं :
एकूण ४१ जहाजे भारताकडे येण्याच्या प्रतीक्षेत.
यापैकी १५ भारतीय तर २६ परदेशी जहाजं आहेत.
डझनभर जहाजांमध्ये खतं भरलेली आहेत.
भारतीय जहाजांमध्ये १० क्रूड, ४ एलपीजी आणि ३ एलएनजी जहाजे आहेत.
या निर्णयाचा होणारा फायदा
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे 'फ्रेट रेट्स' कमी होतील, ज्याचा फायदा सर्व क्षेत्रांना होईल. अमृतसरच्या 'डीआरआरके फूड्स'चे एमडी अमित मारवाह यांनी सांगितलं की, पश्चिम आशियातून मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यांचे १८,००० टन बासमती तांदूळ भारतीय बंदरांवर अडकले होते, जे आता पुढे जाऊ शकतील. इराण युद्धामुळे कंटेनरचे दर ७०० डॉलरवरून चार ते पाच पटीने वाढले होते, जे आता कमी होण्याची शक्यता आहे.
निर्यातदारांची संघटना 'फिओ'चे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, सध्या सुमारे दोन डझन जहाजे मध्यपूर्वेत जाण्यासाठी भारतीय बंदरांवर उभी आहेत. होर्मुजच्या पश्चिमेकडून भारतात पोहोचण्यासाठी जहाजांना ४ ते ६ दिवस लागतात. या मार्ग खुला झाल्यामुळे विशेषतः ऊर्जा पुरवठ्यावरील ताण कमी होईल.
