राजगुरूनगर घटनेच्या नराधमास फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू - रुपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:20 IST2024-12-27T12:19:15+5:302024-12-27T12:20:46+5:30
आपल्या परिसरामध्ये कोणत्याही भागांमध्ये नवीन व्यक्ती बाहेरून राहिला आल्यास तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला असली पाहिजे

राजगुरूनगर घटनेच्या नराधमास फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू - रुपाली चाकणकर
पुणे : राजगुरूनगरमधील एका बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कार्तिकी सुनील मकवाने (वय ९ वर्षे), दुर्वा सुनील मकवाने (वय ८ वर्षे, दोन्ही रा. राजगुरुनगर) अशी मृतांची नावे असून, याप्रकरणी अजय दास (वय ५४ वर्षे, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे. त्यांनतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी बैठक झाली. त्यांनी दोन चिमुकल्यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांशी चर्चा केली आहे. यावेळी आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन माध्यमांशी बोलताना दिले आहे.
चाकणकर म्हणाल्या, राजगुरूनगर व लोणावळा येतील घटना ही दुर्दैवी आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालेल. आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा गैरफायदा घेत होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलीची हत्या केली. एसपी पंकज देशमुख आणि त्यांचे सर्व टीम चांगल्या पद्धतीने तपास कार्य करत आहे. आरोपीला म्हणजे रात्री ९ वाजून ६ मिनिटांनी गुन्हा दाखल झालेला आहे. रात्री पावणे बारा वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू केलं होतं.
पण रात्री पावणे बारा वाजता त्यांना त्यांच्याच घरामध्ये पाण्याच्या पॅरलमध्ये या दोन्ही मुलींचं मृतदेह आढळून आले. संबंधित आरोपीचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर जर सगळे रेल्वे स्टेशन्स असतील किंवा पश्चिम बंगाल कडे जाणारी वाहतूक व्यवस्था असेल. या सगळ्या माध्यमातून तातडीच्या सूचना दिल्या आणि पाहटे चार वाजता म्हणजे साडेचार तासामध्ये त्यांनी आरोपीला अटक केली. आरोपीला अटक झालेली आहे यामध्ये अटक केल्यानंतर आरोपी वरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केलेले आहे. यामधे आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असे चाकणकर यांनी सांगितले आहे.
परराज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा
आम्ही मागणी करणार आहोत की, आपल्या भागामध्ये आलेला नागरिक परराज्यातून आले असतील किंवा बाहेरून आले असेल. त्याची माहिती तातडीने आपल्या जवळच्या संबंधित पोलीस विभागाला कळवा. सोसायटीमध्ये नवीन राहिला आलेली व्यक्ती असेल. ग्रामपंचायत पंचायत समितीच्या भागांमध्ये असेल, प्रभागांमध्ये असेल. आपल्या परिसरामध्ये कोणत्याही भागांमध्ये नवीन व्यक्ती बाहेरून राहिला आल्यास तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला असली पाहिजे. या सगळ्या घटनांमध्ये जवळच्या व्यक्तीकडून अत्याचार झाल्याच आपल्याला पाहायला मिळतात. राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही त्याचा पाठपुरावा करून या अगोदर देखील कोल्हापूरच्या गावात जी अत्याचाराची घटना घडली त्यातल्या आरोपीलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली होती.