रस्त्यावर साचलेले पाणी; अपूर्ण काम, वारकऱ्यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:59 IST2025-06-30T15:55:57+5:302025-06-30T15:59:12+5:30
रस्त्यावर व पुलावर साचलेले पाणी, रस्त्यावर लावलेले शौचालये, रस्त्यांचे अपूर्ण काम याचा नाहक त्रास वारकऱ्यांना यांना सहन करावा लागला

रस्त्यावर साचलेले पाणी; अपूर्ण काम, वारकऱ्यांना सहन करावा लागतोय नाहक त्रास
निमगाव केतकी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने वारकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. निमगाव केतकी येथून रविवारी सकाळी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर कडे मार्गस्थ झाला. यावेळी निमगाव केतकी ते इरिगेशन बंगला या एक किलोमीटर अंतरातील रस्त्यावर व पुलावर साचलेले पाणी, रस्त्यावर लावलेले शौचालये, रस्त्यांचे अपूर्ण काम याचा नाहक त्रास वारकऱ्यांना यांना सहन करावा लागला.
अंथुर्णे येथील मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने पालखीला शनिवारी सणसर येथून निमगाव केतकी येथे येण्यास रात्रीचे साडेआठ वाजले. सवंदडीच्या पुढे पालखी मार्गाचे काम बंद असल्याने जुन्या रस्त्याला साईड पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने व या साईड पट्ट्या मुरुमाने न भरल्यामुळे व रात्री अंधारात न दिसल्याने अनेक वारकरी या ठिकाणी घसरून पडले. रविवारी सकाळी पालखी सोहळा इंदापूर कडे जाताना गावाच्या बाहेर असलेल्या ओढ्यावरील म्हेत्रे पुलावर टँकर मधून सांडलेले पाणी मोठ्या प्रमाणात साठलेले होते. पुलावरील साठलेले पाणी काढून देणे गरजेचे असताना ते न काढल्यामुळे वारकऱ्यांना याचा त्रास झाला.
त्या पुढे केतकेश्वर विद्यालयाच्या शेजारील उड्डाणपूल अपूर्ण अवस्थेत आहे. तिथे सुरुवातीलाच दोन्ही बाजूला पाणी साठल्यामुळे याचाही वारकऱ्यांना व वाहनचालकांना त्रास झाला. उड्डाणपूल सुरू न झाल्यामुळे सर्विस रस्त्याचा वापर करावा लागतो. सर्विस रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रमाणापेक्षा मोठे गतिरोधक बसवलेले आहेत त्यावरती पांढरे पट्टे देखील ओढलेले नाहीत. त्याचाही त्रास वारकऱ्यांना झाला व दररोज वाहनचालकांना तर सोसावा च लागतो. सकाळी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन चांगले केले होते.