अपघातानंतर आली जाग; कृषी महाविद्यालय प्रशासन ॲक्शन माेडवर, दुर्घटनेला जबाबदार व्यक्तीवर कारवाई होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 10:04 IST2026-03-27T10:02:50+5:302026-03-27T10:04:30+5:30
वारंवार तक्रार करूनही वाॅटर कुलरची दुरुस्ती केली गेली नाही. परिणामी चैतन्यला जीव गमवावा लागला, अशी तीव्र भावना विद्यार्थी व्यक्त करीत आहेत

अपघातानंतर आली जाग; कृषी महाविद्यालय प्रशासन ॲक्शन माेडवर, दुर्घटनेला जबाबदार व्यक्तीवर कारवाई होणार
पुणे: दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या कृषी महाविद्यालयात प्रशासनाच्या दुर्लक्षाने एका तरुणाचा बळी जाताे आणि झाेपेत असलेली सर्व यंत्रणा खडबडून जागी हाेते. वारंवार तक्रार करूनही वाॅटर कुलरची दुरुस्ती केली गेली नाही. परिणामी चैतन्यला जीव गमवावा लागला, अशी तीव्र भावना विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. पण, याच्या अगदी उलट प्रशासन सांगत आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं खरं काय? याचा तपास करून समितीनेच सत्य पुढे मांडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देशात स्थापन झालेल्या पहिल्या पाच कृषी महाविद्यालयांपैकी एक म्हणजे पुणे कृषी महाविद्यालय. येथे शिक्षण घेता यावे, हेच अनेकांचे स्वप्न असते. हेच स्वप्न उरी बाळगून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डाेंगरगण या छाेट्याशा गावातील चैतन्य चव्हाण हा तरुण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आला. येथेच उच्च शिक्षण पूर्ण करावे, साेबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून लाल दिव्याची गाडी मिळवावी, माेठा अधिकारी हाेऊन सामान्य लाेकांना न्याय देता यावा, या दृष्टीने त्याची पाऊलवाट सुरू हाेती. पण, विजेचा शाॅक लागून चैतन्य याचा मृत्यू झाला आणि सर्व स्वप्न मध्येच भंगले आहे.
प्राचार्य डाॅ. दयानंद माने म्हणाले की, कृषी विद्यापीठाचे डीन डॉ. साताप्पा खरबडे यांच्यासह मी आणि माझी संपूर्ण टीमने गुरुवारी सर्व परिसराची पाहणी केली आहे. या घटनेची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. साेबतच वसतिगृहातील सर्व देखभाल-दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून, नवीन सहा वाॅटर कुलरही बसविण्यात येणार आहेत. पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून प्रशासन दक्ष आहे.
चैतन्य चव्हाण हा मुलगा खूप हुशार आणि गुणी हाेता. तसेच समाजकार्यात ताे कायम पुढे असे. दुर्घटनेच्या अगदी चार दिवस आधीच मेस कमिटीची बैठक झाली हाेती. त्यात चैतन्य आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काही अडचणी मांडल्या हाेत्या. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी अर्थात ११ मार्च राेजी मी आणि माझी टीम वसतिगृह आणि मेस परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. स्टाेअर रूममध्ये हाेणारी पाणी गळती, झाडावरून अचानक नारळ पडून दुर्घटना हाेण्याचा धाेका, यासह विविध प्रश्नांनी चर्चा करण्यात आली. त्यावर तत्काळ ॲक्शनही घेण्यात आली. काही प्रश्न मार्गी लावले, तर साेडवण्याच्या काही प्रक्रियेत हाेते. या दरम्यान वाॅटर कुलरला स्पर्श केल्याने शाॅक लागत आहे, असे कुणी निदर्शनास आणून दिले असते, तर आज चैतन्य आपल्यात राहिला असता. दुर्दैवाने तसे घडले नाही. सदर धाेका वायरमनच्याही निदर्शनास आणून दिला गेला नाही. याचे खूप वाईट वाटत आहे, असेही डाॅ. माने म्हणाले.
प्रत्यक्ष कृती हाेण्याची गरज
मेस कमिटीसाेबत १० मार्च राेजी बैठक झाली हाेती. त्यात चैतन्य देखील उपस्थित हाेता. त्याने स्टाेअर रूममध्ये गळती हाेत असून, अन्नाची नासाडी हाेण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त केली हाेती. त्यानंतर तातडीने ११ मार्च राेजी मेसला भेट देऊन प्रश्न मार्गी लावला हाेता. यावेळी वाॅटर कुलरचा मुद्दा चर्चेत आला असता तर तातडीने साेडवता आला असता, असे प्राचार्यांनी सांगितले. मात्र या बैठकीस उपस्थित असलेल्या मेस समितीच्या सदस्यांनी वाॅटर कुलरचा मुद्दा देखील मांडला गेला हाेता. प्रशासनाने ठाेस निर्णय घेण्याऐवजी छाेटी-छाेटी कामे केली. आता तरी ठाेस निर्णय घेऊन कामे मार्गी लावली जावीत, अशी अपेक्षा आहे. राजकीय नेत्यांप्रमाणे ‘आश्वासने नकाे, कृती हवी’ अशीही भावना व्यक्त केली.
विजेच्या धक्क्याने कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा बळी गेला. याबाबत कळताच महाविद्यालय प्रशासनाकडून तातडीने घटनेची माहिती मागवली आहे. तसेच चाैकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत. देखभाल-दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यासह संबंधित दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल. तसेच चैतन्य चव्हाण याच्या कुटुंबीयांना सरकारकडून याेग्य ती मदत केली जाईल. - दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री