दोघांमध्ये नेहमी वाद; त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 18:29 IST2026-02-17T18:28:46+5:302026-02-17T18:29:22+5:30
१३ वर्षापूर्वी दोघांचे लग्न झाले होते. परंतु, दोघा पतीपत्नीचे पटत नसल्याने त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती

दोघांमध्ये नेहमी वाद; त्रासाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल, पत्नीवर गुन्हा दाखल
पुणे: कौटुंबिक वादातून सलून मालकाने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. हा प्रकार शिवणे येथील दांगट इस्टेटमधील एका सोसायटीत घडला. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन वारजे पोलिसांनी पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महेश दत्तात्रय क्षीरसागर (वय ४०, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.याबाबत दत्तात्रय बाबुराव क्षीरसागर (वय ६८, रा. गिरीधरनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रतिभा महेश क्षीरसागर (वय ३५, रा. दांगट इस्टेट, शिवणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार दि. २ फेब्रुवारी रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश क्षीरसागर यांचे सुमारे १३ वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. परंतु, दोघा पतीपत्नीचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. कौटुंबिक वादातून गेल्या वर्षी प्रतिभा क्षीरसागर या माहेरी निघून गेल्या होत्या. त्यानंतर महेश यांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत घरी आणले होते. त्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटला नव्हता. या कौटुंबिक त्रासाला कंटाळून महेश क्षीरसागर यांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. महेश क्षीरसागर यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतर धार्मिक विधी पार पडल्यावर त्यांच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक लुगडे तपास करीत आहेत.