हिंजवडीत पावसाने झालेली दुर्दशा सरकारसाठी लाजीरवाणी; पुण्यातून काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 15:21 IST2025-06-10T15:20:31+5:302025-06-10T15:21:39+5:30

महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही भरीव काम करू शकलेले नाहीत

The plight of Hinjewadi due to rain is an embarrassment for the government Congress criticizes from Pune | हिंजवडीत पावसाने झालेली दुर्दशा सरकारसाठी लाजीरवाणी; पुण्यातून काँग्रेसची टीका

हिंजवडीत पावसाने झालेली दुर्दशा सरकारसाठी लाजीरवाणी; पुण्यातून काँग्रेसची टीका

पुणे : आयटी पार्क असलेल्या हिंजवडी येथील रस्ते जलमय होऊन उडालेली दैना राज्यातील भाजप सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्याचे धोरण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आखले होते. त्यातूनच हैदराबाद, पुणे, बंगळुरू येथे आयटी पार्क विकसित झाले. हिंजवडीतील प्रकल्पाला उत्तेजन देऊन अधिकाधिक उद्योजक पुण्याकडे यावेत, याकरिता ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांनी अथक प्रयत्न केले. केंद्र आणि राज्यात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यानंतर पुण्यातील आयटी क्षेत्राला गती मिळण्याऐवजी ब्रेक लागला आहे.

हिंजवडीमधील आयटी पार्कमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणे, त्यांना मूलभूत नागरी सुविधा पुरविणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. पण त्यात कुचराई होत असल्याने अनेक उद्योग पुण्यातून बाहेर जात आहेत. महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आश्वासने देण्यापलीकडे कोणतेही भरीव काम करू शकलेले नाहीत. विद्यापीठ रस्त्यावरील उड्डाणपूल तातडीने उभा करण्यात पालकमंत्र्यांना अपयश आले आहे. यामुळे औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी या भागातील रहिवाशांची वाहतुकीसाठी गैरसोय होत आहे. परंतु, सरकारला त्याची फिकीर नाही. कामाऐवजी भूमिपूजन आणि एकाच प्रकल्पाची वारंवार उद्घाटने करणे यातच भाजप नेते रमले आहेत, असेही जोशी यांनी म्हटले आहे.

Web Title: The plight of Hinjewadi due to rain is an embarrassment for the government Congress criticizes from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.