८ गावांना टँकर सुरू, मे महिन्यात गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार, खेड तालुक्यातील परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:06 IST2026-04-11T12:04:56+5:302026-04-11T12:06:28+5:30
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या कृषी विभागांतर्गत नदी ओढा खोलीकरणासह बंधारे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला

८ गावांना टँकर सुरू, मे महिन्यात गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार, खेड तालुक्यातील परिस्थिती
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पूर्व भागातील पाणीटंचाई निर्माण होऊन टँकर सुरु करण्याबाबत पंचायत समितीकडे दाखल झालेल्या १२ गावांपैकी ८ गावांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता टँकर सुरु करण्याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी टँकर सुरु करण्याचे निर्देश प्रशासनाला ८ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर होऊन सुरु झाल्याची माहिती खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते यांनी दिली.
तालुक्याच्या पूर्व भागातील वाकळवाडी,पूर,गुळाणी या प्रत्येक गावाला दररोज ३ टँकरने, तर वाफगाव, कन्हेरसर, वरुडे गावासाठी दररोज ५ टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. पश्चिम भागातील कडुस परीसरातील कोहिंडे बुद्रूक येथे दररोज ५ टँकरने, तळवडे येथे दररोज २ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असून उपलब्ध झालेल्या खासगी टँकरच्या साहाय्याने ८ गावांना ३१ फेऱ्यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे उपसभापती मंगेश सावंत, सदस्य दिलीप डुबे, माउली ढेरंगे यांनी सांगितले. खेड तालुक्याच्या अवर्षणप्रवण असणाऱ्या पूर्व भागातील विविध गावांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या कृषी विभागांतर्गत नदी ओढा खोलीकरणासह बंधारे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाला. तर कंपन्यांच्या सीएसआर फंडातून कामे झाली मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आजही या भागातील विविध गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असले तरी संपूर्ण खेड तालुक्यातील उन्हाळ्यातील विविध गावे वाड्या - वस्त्यांना टॅंकर मुक्त करण्याचे धोरण राबवून पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच पूर्व भागातील शेती जलसिंचनाखाली आणण्यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. तर पश्चिम भागाच्या धरणांतर्गत पिण्याच्या पाण्याची समस्येवर मात करुन पूल कम बंधाऱ्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन अंतिम टप्प्यात आले असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले.