जोराचा पाऊस म्हणून कडेला थांबले; अचानक वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:46 IST2025-06-13T19:46:11+5:302025-06-13T19:46:59+5:30
जोरदार पाऊस सुरु झाल्याने पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिकचा कागद घेऊन रस्त्याच्या कडेला उभे राहिले होते

जोराचा पाऊस म्हणून कडेला थांबले; अचानक वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना
केडगाव: दौंड तालुक्यातील बोरीपार्धी (ता दौंड) येथील संजय जगन्नाथ जगताप (वय ५५) यांच्यावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे. जगताप यांच्या गट नंबर १६८/२ या क्षेत्रात शेत काम चालू होते. त्यांच्या शेतामध्ये फ्लॉवर पीक होते. या पिकाची तोडणी शेतीमध्ये चालू होती. मजुरांचे व कुटुंबातील सदस्यांचे शेतामध्ये काम सुरू होते. सायंकाळी पाचच्या सुमारास जगताप हे आपल्या मुलांना मोटरसायकल वरून शेतातील काम आटपुन सोडायला गेले होते.
रस्त्यात थोडे पावसामुळे बाजूला थांबले होते. अंगावर पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिकचा कागद घेऊन उभे राहिले होते. इतक्यात विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. अचानक त्यांच्यावर वीज कोसळली असे परिसरातील नागरिकांनी सांगितले. वीज कोसळल्यानंतर मगर मळा येथील डांबरी रस्त्यावर सुमारे १ ते दीड फुटाचा खड्डा पडला आहे. जगताप यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी भाऊ भाऊजी आई वडील असा परिवार आहे. परिसरातील शेतकरी या घटनेने भयभीत झालेले आहेत. याच परिसरातील दोन ऊसतोड कामगारांच्या वस्तीत असलेल्या नारळाच्या झाडावर देखील कालच दिनांक १२ रोजी वीज कोसळली होती. विजेमुळे नारळाच्या झाडाने व या कामगारांच्या झोपडीने पेट घेतला. त्यामध्ये कामगारांचे दोन चिमुकले भाजले. सुदैवाने दोन्हीही चिमुकले बचावले आहेत. त्यांच्यावर केडगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सदर घटनास्थळी भेट दिली. जोराचा वारा असल्यानंतर सुरक्षित आडोशाला उभे राहावे. तसेच परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी केले आहे.