पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवार (दि. २०) पासून सुरू हाेत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुलगे, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण ५ हजार १११ मुख्य केंद्रांवर ही परीक्षा हाेणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष डाॅ. नंदकुमार बेडशे यांनी ही माहिती दिली.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा हाेत आहे. या परीक्षेसाठी एकूण २३,६८३ शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. १८ मार्च राेजी शेवट हाेणार आहे. दरम्यान, बारावी परीक्षेत घडलेल्या काॅपी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बैठे पथक वाढवण्यावर भर दिला आहे. दहावी बाेर्डाच्या एकूण ५,१११पैकी १९१ केंद्र संवेदनशील आहेत. ही बाब विचारात घेऊन प्रशासनाकडून जिल्हा दक्षता समिती मार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असावी, असा आमचा प्रयत्न हाेता. पण, ५५४ केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध हाेऊ शकली नाही, असेही डाॅ. बेडशे यांनी स्पष्ट केले.
इयत्ता बारावी प्रमाणेच दहावी बाेर्ड परीक्षेला सामाेरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येऊ नये. राज्यात सर्वत्र तणावमुक्त आणि काॅपीमुक्त परीक्षा पार पडावी म्हणून राज्य मंडळाने विशेष खबरदारी घेतली आहे. विद्यार्थ्यांनाे, परीक्षेचा ताण आल्यास चिंता करत न बसता फाेन करा आणि शंकांचे निरसण करून तणावमुक्त व्हा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाने केले आहे. यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करून संपर्क क्रमांक देखील उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांनी ९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७९६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८, ९४०४७८३९९६ या क्रमांकांवर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसण कराव, असे आवाहन करून अध्यक्ष डाॅ. नंदकुमार बेडशे यांनी सर्व विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
Web Summary : Maharashtra's SSC exams start tomorrow with 16.15 lakh students. The board urges students to stay calm, offering helpline numbers for stress relief and ensuring measures for fair conduct, especially at sensitive centers.
Web Summary : महाराष्ट्र में एसएससी परीक्षा कल से शुरू, 16.15 लाख छात्र देंगे। बोर्ड ने छात्रों से शांत रहने का आग्रह किया, तनाव से राहत के लिए हेल्पलाइन नंबर दिए, और निष्पक्ष परीक्षा के लिए उपाय किए।