पुण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; शाळांमधील पोषण आहार योजना अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:23 IST2026-03-13T10:22:36+5:302026-03-13T10:23:00+5:30
गेल्या दोन दिवसांपासून ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवू लागली असून, गॅस उपलब्ध न झाल्यास पोषण आहार योजना विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे

पुण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा; शाळांमधील पोषण आहार योजना अडचणीत
उजमा शेख
पुणे: आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या इराणमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता शालेय पोषण आहार योजनेवर ही दिसू लागण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात झालेल्या तुटवड्यामुळे अनेक शाळांमध्ये पोषण आहार तयार करणे कठीण झाले असून काही ठिकाणी बचत गटाच्या महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही समस्या अधिक प्रकर्षाने जाणवू लागली असून, गॅस उपलब्ध न झाल्यास पोषण आहार योजना विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी दिला जाणारा पोषण आहार तयार करण्याची जबाबदारी महिला बचत गटांकडे असते. मात्र सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, गॅसचा पुरवठा आणखी काही दिवस विस्कळीत राहिला तर शालेय पोषण आहार योजना अडचणीत येऊ शकते. विद्यार्थ्यांना नियमितपणे पोषण आहार मिळावा यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून आणि महिला बचत गटांकडून करण्यात येत आहे.
तातडीने उपाययोजना करा; अन्यथा दोन दिवसांत अनेक ठिकाणी पोषण आहार योजना पडणार बंद.
आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. तरीही कुठे काही अडचण निर्माण झाल्यास तातडीने लक्षात घेऊन समस्येचे पूर्णपणे निराकरण करू.- संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.
गॅस पुरवठ्याबाबत शालेय पोषण आहार योजनेला बसू लागला. अनेक बचत गटांना गॅस टंचाईची अडचण जाणवत आहे. ही परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर पुढील काळात समस्या अधिक वाढू शकते.- नितीन मेमाणे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
अनेक ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येत आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर पोषण आहार देणे कठीण होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन शासनाने शाळांसाठी गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.- महिला बचत गट सदस्य
शालेय पोषण आहार योजना काय ?
शालेय पोषण आहार योजना ही राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणारी महत्त्वाची शासकीय योजना आहे. या योजनेअंतर्गत शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज शाळेत गरम व पौष्टिक अन्न दिले जाते. भात, डाळ, खिचडी, भाज्या असे पौष्टिक पदार्थ आहारात दिले जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारते आणि कुपोषण कमी होण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढते आणि शिक्षणाकडे त्यांचा कल वाढतो. गरीब व गरजू कुटुंबातील मुलांना योग्य पोषण मिळावे आणि त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली व्हावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.