पुणे : माहिती तंत्रज्ञानातील आघाडीनंतर आता पुणे ग्लोबल कपॅसिटी सेंटरमध्ये आघाडी घेत आहे. सर्वाधिक ‘जीसीसी’ पुणे परिसरात तयार होत असल्याने पुणे आता देशाची ‘जीसीसी राजधानी’ म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे पुण्याचे आर्थिक व औद्योगिक महत्त्व आणखी वाढले आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आनंदऋषीजी चौकात उभारण्यात आलेल्या दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मंजूषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, 'पीएमआरडीए'चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रियाज पठाण, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी या उड्डाणपुलास दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याच्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘दर्जेदार पायाभूत सुविधा हा विकासामधील महत्त्वाचा घटक आहे. उत्तम ‘इकोसिस्टम’ असूनही पायाभूत सुविधांची कमतरता व कोंडीमुळे बंगळुरूची वाढ काही प्रमाणात थांबली आहे. त्यामुळे तेथील गुंतवणुकीलाही फटका बसत आहे. त्यामुळे पुणे शहराला ‘डी-कंजेस्ट’ करणे हे शासन प्राधान्याने प्रयत्न करीत आहे. पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम सुरू केले आहे. पुणे व परिसरासाठी दोन चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) आणि इतर सेवांना बळ दिले जात आहे.’
‘विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते; मात्र सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत अजित पवार यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्याचे सकारात्मक परिणाम पुणेकरांना दिसत आहेत,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. विद्यापीठ मुख्यद्वारासमोर व गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.’ यावेळी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार प्रकल्पांच्या कामांमध्ये कसे आग्रही असत, याची अनेक उदाहरणे देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुरलीधर मोहोळ, मिसाळ, महापौर नागपुरे, आ. शिरोळे यांची भाषणे झाली. प्राधिकरणाचे माजी आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्रास्ताविक केले.
असा आहे दुमजली उड्डाणपूल
▪️उड्डाणपुलाची एकूण लांबी (रॅम्पसह) १७६३.५२ मीटर आहे.
▪️प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता किंमत ₹२७७ कोटी आहे.
▪️औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना जोडणारी रॅम्प व वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
▪️वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ५५ मीटर लांबीचा स्टील गर्डर बसविण्यात आला आहे.