पुणे : मान्सून येण्यापूर्वी अर्थात मे महिन्यातच राज्यात विशेषतः पुणे व लगतच्या परिसरात पूर्व मोसमी पाऊस हा मुख्यत्वे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झाला. परिणामी संपूर्ण मे महिना पाऊस पडत राहिला. हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र असल्याने पुणे आणि मुंबईत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. तसेच याच काळात अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांनी मान्सूनच्या प्रवाहाला राज्यात वेगाने खेचून आणल्यामुळे पूर्व मोसमी आणि मोसमी पाऊस एकत्रच पडला, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.
यंदाचा मे महिना पावसाचा राहिला. त्यामुळे उन्हाळा एप्रिलमध्येच संपला अशी म्हणण्याची वेळ आली. मे महिन्याच्या साधारण दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पूर्व मोसमी पावसाने अगदी मान्सूनच्या आगमनापर्यंत राज्याला झोडपून काढले. याबाबत काश्यपी म्हणाले, ‘यासाठी दोन कारणे महत्त्वाची ठरली आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीच्या अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि दुसरे म्हणजे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिमी वाऱ्यांना मिळालेली गती. हा कमी दाबाचा पट्टा सुरुवातीला कमी दाबाचे क्षेत्र होते. उत्तरकडे वेगाने सरकत असताना या कमी दाबाच्या क्षेत्राने कोकणामार्गे राज्यात प्रवेश केला. या क्षेत्राचे नंतर कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन त्याची तीव्रता वाढत गेली. हा पट्टा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सोमवारपर्यंत अर्थात मान्सूनच्या आगमनापर्यंत सक्रिय होता. त्यामुळेच पूर्व मोसमी पावसाने राज्यात मोठ्या प्रमाणात अक्षरश: धुमाकूळ घातला.
याच दरम्यान मोसमी वारे अर्थात मान्सूनचा प्रवाह सक्रिय झाला. वेळेपूर्वीच केरळमध्ये रविवारी दाखल झालेल्या मान्सूनने सोमवारी राज्यातही हजेरी लावली. ती ही जोरदार हजेरी ठरली. मान्सूनच्या प्रगतीत पश्चिमी वाऱ्यांचा मोठा प्रभाव असतो. हे वारे जितके तीव्र तितकाच पावसाचा जोर जास्त असतो. पूर्व मोसमी वाऱ्यांमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम वारेही तीव्र झाले. या वाऱ्यांमध्ये आर्द्रतेचे वाहून नेण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे अरबी समुद्राहून अधिक प्रमाणात आलेल्या आर्द्रतेमुळे राज्यात मान्सूनमुळे जोरदार पावसाला सुरुवात झाली. हे पश्चिमी वारे सह्याद्री रांगांना धडकल्यामुळे संपूर्ण कोकणासह मुंबई आणि पुणे, सातारा कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली, असेही त्यांनी सांगितले.
अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यावर येणाऱ्या वाऱ्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास पाऊस येतो. राज्यातील पूर्व मोसमी पावसासाठी हाच कमी दाबाचा पट्टा कारणीभूत ठरला आहे. त्यामुळेच मे महिन्यात हा पाऊस पडला. मान्सूनच्या आगमनापूर्वी त्याचा प्रभाव कायम होता. - डॉ. अनुपम काश्यपी, निवृत्त शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे