- बी. एम. काळे
जेजुरी : हवेली तालुक्यातील ३४ गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर त्या भागातील शाळांमधील सुमारे ४२० शिक्षकांचे दुर्गम भागातील शाळांमध्ये समायोजन करण्यात आले होते. मात्र, बदली झालेल्या तब्बल ६३ शिक्षकांनी तीन महिन्यांपासून संबंधित शाळांवर हजेरीच लावली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या संदर्भात यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तातूनही संबंधित शिक्षकांनी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू न झाल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तरीही अनेक तालुक्यांतील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या शिक्षकांना कार्यमुक्त न करता त्यांच्या गैरहजेरीबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर केला नसल्याचे उघड झाले आहे.
नियमांनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग झाल्याने संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसून, उलट गैरहजर शिक्षकांच्या रजा मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नियमांना बगल देत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षक व पालकवर्गातून केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी सांगितले की, “प्रकरणाची माहिती घेण्यात आली असून, सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून आवश्यक अहवाल मागविण्यात आले आहेत. नियमांनुसार सखोल पडताळणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. अनियमितता आढळल्यास ती सहन केली जाणार नाही.”
Web Summary : Despite transfers, 63 teachers remain absent, defying orders. Action is delayed, with leave approvals under scrutiny. Negligence raises concerns; investigation demanded.
Web Summary : स्थानांतरण के बावजूद, 63 शिक्षक अनुपस्थित हैं, आदेशों की अवहेलना कर रहे हैं। कार्रवाई में देरी हो रही है, छुट्टी की मंजूरी जांच के दायरे में है। लापरवाही से चिंता बढ़ रही है; जांच की मांग की गई।