Pune: अक्षरशः मुलींना चक्कर आली; दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा, कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 10:16 IST2026-02-14T10:15:56+5:302026-02-14T10:16:50+5:30
जानेवारी महिन्यातच आम्ही दूषित पाण्याबाबत तक्रार केली होती, पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले आहेत - विद्यार्थिनींची प्रतिक्रिया

Pune: अक्षरशः मुलींना चक्कर आली; दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा, कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार
लोहगाव : येथील मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ॲाफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या १२ विद्यार्थिनींना दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या सर्व विद्यार्थिनींवर सध्या साईश्रद्धा हॉस्पिटल, लोहगाव येथे उपचार सुरू असून, कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा संताप विद्यार्थिनींनी व्यक्त केला आहे.
बाधीत विद्यार्थिनींशी संवाद साधला असता, त्यांनी कॉलेज प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. विद्यार्थिनींनी सांगितले की, ‘आम्ही वापरत असलेल्या पाण्याच्या फिल्टरमधून पिवळसर आणि घाण पाणी येत होते. १० फेब्रुवारी रोजी आम्ही पाण्याच्या टाकीत आणि बादलीत काळ्या रंगाच्या अळ्या पाहिल्या होत्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही कॉलेज प्रशासनाला दाखवले, त्याबाबत तक्रारही केली तरी कोणतीही कारवाई केली नाही. ‘जानेवारी महिन्यातच आम्ही दूषित पाण्याबाबत तक्रार केली होती; पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. फिल्टर बदललाच नव्हता. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले आहेत. जेव्हा आम्ही फिल्टर उघडून दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्हाला ‘तुम्ही कोण विचारणार? तुम्हाला तो अधिकार नाही’, असे म्हणून गप्प करण्यात आले.
या संदर्भात कॉलेजच्या प्राचार्य रूपेश भोरटाके यांच्याशी संपर्क साधला असता, मी बाहेरगावी जात असताना ही घटना कळाली व ‘आम्ही तपास करत आहोत’ असे त्रोटक उत्तर दिले. अधिक विचारणा केली असता दोषींवर कारवाई करू असे आश्वासन दिले.
रुग्णालयात दाखल विद्यार्थिनींची नावे
श्रेणी महाडिक (चिपळूण), रुपाली महाजन (जळगाव), श्रीनिधी गुप्ता (नागपूर), साक्षी स्वामी (अहिल्यानगर), सिद्धी उमाटे (लातूर), श्रेयश इरकर (धाराशिव), मानसी देशमुख (परभणी), कुनिका देवळकर (चंद्रपूर), कमलेश निकम (चाळीसगाव), तृप्ती गावंडे (संभाजीनगर), प्रणया चव्हाण (कारंजा), समृद्धी हांडे (जुन्नर)
विद्यार्थिनींच्या जीविताशी खेळ; अक्षरशः चक्कर येऊन पडल्या मुली
विषबाधेची तीव्रता इतकी होती की, विद्यार्थिनी वसतिगृहातच चक्कर येऊन पडू लागल्या. चालता बोलता विद्यार्थिनी खाली पडत असल्याने एकच खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनींनी स्वत: दवाखान्यात जाऊन तपासणी केली, सलाइनही घेतले; परंतु वसतिगृहात परत गेल्यावर पुन्हा त्रास सुरू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा कॉलेज परिसर सुनसान आहे. तेथे वाहतुकीची वर्दळ नसते. मुलींना त्रास होत असतानाही कॉलेज प्रशासनाने वेळेवर रुग्णवाहिका किंवा स्वतःची गाडी उपलब्ध करून दिली नाही. मुलींना खासगी वाहनाने किंवा एकमेकींच्या मदतीने रुग्णालयात जावे लागले.
रक्त चाचणी अहवाल दडपण्याचा प्रयत्न आणि धमकी
रुग्णालयात उपचार घेत असताना विद्यार्थिनींनी त्यांच्या रक्ताच्या चाचणीचे (ब्लड रिपोर्ट) अहवाल मागितले. मात्र, त्यांना रिपोर्ट देण्यास टाळाटाळ केली जात होती. विद्यार्थिनींचा आरोप आहे की, ‘कॉलेज कर्मचारी आम्हाला सांगत आहे की अहवाल त्यांच्याकडे आहेत आणि ते योग्य वेळी दाखवले जातील. आम्हाला आमची वैद्यकीय स्थिती जाणून घेण्याचा हक्क आहे; पण तो नाकारला जात होता. इतकेच नाही तर, मीडिया किंवा पोलिसांकडे तक्रार करू नये यासाठी विद्यार्थिनींवर दबाव टाकला जात होता. आमच्या स्टुडंट कौन्सिलच्या प्रमुखाला बोलावून सांगण्यात आले की, पोलिसांना किंवा मीडियाला काहीही सांगू नका. जर तक्रार केली तर कारवाई करण्याची धमकीही दिली जात होती,’ असे विदारक सत्य विद्यार्थिनींनी लोकमतला उलगडून सांगितले.
सदर विद्यार्थ्यांनी काल रात्री उलट्या चक्कर येत असल्याने ॲडमीट झाल्या कालच त्यांचे सोनोग्राफी, रक्तचाचणी नमुने घेऊन आज सकाळी ११.३० लाच रिपोर्ट आलेत. ज्यांना पाहायचे त्यांनी थेट नर्स किंवा डॅाक्टरांना विचारून पहावे, इतर कुणाला विचारून काय फायदा ? सध्या सगळ्या विद्यार्थीनी नॅार्मल आहे, जनरल वॅार्डमध्ये आहेत. - डॅा. विकास गायकवाड, साईश्रद्धा हॅास्पिटल