नवीन आवृत्तीसाठी प्रकाशकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?' असा बदल करण्यास हरकत नव्हती - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 21:02 IST2026-04-28T21:02:04+5:302026-04-28T21:02:15+5:30
संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी आहेत, सर्वच लोकप्रतिनिधींनी वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे

नवीन आवृत्तीसाठी प्रकाशकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?' असा बदल करण्यास हरकत नव्हती - रामदास आठवले
पुणे: राज्यात सुरु असलेल्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वक्तव्य करावीत अशी प्रतिक्रिया पुण्यात पत्रकार परिषदेत दिली आहे. पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित करताना प्रकाशकांनी 'छत्रपती शिवाजी महाराज कोण होते?' असा बदल करण्यास हरकत नव्हती. मात्र, संजय गायकवाड हे लोकप्रतिनिधी आहेत. सर्वच लोकप्रतिनिधींनी वक्तव्य करताना जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी आणि आंबेडकर चळवळीतील सर्व घटकांनी एकत्र यावे, यासाठी आंबेडकरी समाज आसुसलेला आहे. त्यासाठी आपण अनेकदा प्रयत्न केले आहेत. मात्र, एकत्रीकरण होणारच नसेल तर आपल्या पक्षाचा वेगाने विस्तार करणे हेच आपल्या समोरचे उद्दिष्ट आहे. विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळाचे अध्यक्षपद आणि विविध महामंडळामध्ये ५० सदस्य पक्षाला मिळावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
पुणे येथील आंबेडकर भवन च्या पाठीमागची जागा स्मारकासाठी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनाची त्वरित पूर्तता करण्यात यावी, कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाजवळ विजय स्मारकासाठी सरकारकडून २०० एकर जागा उपलब्ध व्हावी, अशा मागण्याही आठवले यांनी केल्या. धम्मचक्र दिनी १४ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही काळ वास्तव्य असलेल्या सातारा येथून सामाजिक समरसता मार्च काढण्यात येणार असून तो महाराष्ट्रभर जाईल आणि त्याचा समारोप पुण्यात करण्यात येईल, असेही आठवले यांनी नमूद केले.
धार्मिक गुरूंनी वादग्रस्त विधानाऐवजी प्रबोधन करावे
बाबा बागेश्वर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या धार्मिक गुरूंनी वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा समाजाचे प्रबोधन करावे. लोकांच्या जीवनामध्ये विधायक बदल कसे होतील, या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.