महिला विधेयकाला विरोध दर्शवल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मोठे नुकसान होणार - तेजस्वी सूर्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:57 IST2026-04-23T11:57:02+5:302026-04-23T11:57:29+5:30
नारी शक्ती वंदन अधिनियम आणि परिसीमन विधेयकाला विरोध करून महिलांसमवेत महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधीत्वाच्या हक्काचाही काँग्रेसने विश्वासघात केला

महिला विधेयकाला विरोध दर्शवल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मोठे नुकसान होणार - तेजस्वी सूर्या
पुणे : महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे सांगतानाच काँग्रेससह इंडिया आघाडीने नारी शक्ती वंदन अधिनियम आणि परिसीमन विधेयकाला विरोध करून महिलांसमवेत महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधीत्वाच्या हक्काचाही विश्वासघात केला आहे, अशी टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सूर्या यांनी केला.
नारी शक्ती वंदन अधिनियमातील दुरुस्ती आणि परिसीमन विधेयक संसदेत पारित होऊ शकले नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि विरोधी पक्षांवर टीका केली. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्राजक्ता जोशी, प्रणव गंजीवाले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
तेजस्वी सूर्या म्हणाले, काँग्रेसचा इतिहासच महिलाविरोधी असून, महिलांच्या प्रगतीत काँग्रेसने कायम अडथळे आणले आहेत. हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. परिसीमन विधेयकाद्वारे महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ५० टक्के जागा प्रो-रेटा बेसवर वाढविण्यात येणार होत्या. मात्र, काँग्रेससह उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार)ने त्याला विरोध दर्शविल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार असून, त्याबाबत मतदारांनी विरोधकांना जाब विचारला पाहिजे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या ५४३ जागांची पुनर्रचना केल्यास महाराष्ट्राच्या वाट्याला अवघी एक अतिरिक्त जागा येणार आहे. मोदी सरकारच्या फॉर्म्युलानुसार, महाराष्ट्राला २४ अतिरिक्त जागा मिळतील. त्यामुळे महाराष्ट्राचा फायदा होईल. मात्र, विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचाही विश्वासघात केला असून मतदारच विरोधकांना धडा शिकवतील, असे तेजस्वी सूर्या यांनी सांगितले.